मुंबई : बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व यंत्रणांसोबतच आता महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघही विसर्जनला सहाय्य करणार आहे. भरती-ओहोटीच्या वेळेस विसर्जित न झालेल्या मूर्तींचे महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून पुनर्विसजन करण्यात येणार आहे. त्याकरिता, महासंघातर्फे स्वयंसेवी संस्था आणि मंडळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन लवकरात लवकर व्हावे, याकरिता संघातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. तसेच, महासंघातर्फे मंडळांना मिरवणूका लवकरात लवकर काढून सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय, मिरवणूकांमधील डीजेमुळे होणाऱ्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपरिक ढोल वाद्यांचा वापर करण्याचे आवाहनही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.शहर-उपनगरात विसर्जन मिरवणूकांचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्यासाठी महासंघाचे कार्यकर्ते मदत करतील. तसेच, जागोजागी पाणी वाटपाचा कार्यक्रमही करण्यात येईल. गिरगाव चौपाटीवर येण्याचे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
विसर्जित न झालेल्या मूर्तींचे पुनर्विसर्जन
By admin | Updated: September 27, 2015 00:21 IST