सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवाशीच्या तलावातील गाळामुळे दहाव्या दिवशीच्या विसर्जनात अडथळा होवू लागला आहे. तलावाच्या एकुन पातळीच्या निम्म्या भागात गाळ साचल्याने त्यामध्ये स्वयंसेवकाचे पाय रुतत आहेत. तर हिच परिस्थीती शहरातील इतर विसर्जन तलावांमध्येही असण्याची शक्यता आहे.गणरायाचे वाजत गाजत आगमण झाल्यानंतर दुसरयाच दिवसापासून दिड दिवसाच्या विसर्जनाला सुरवात झाली आहे. शहरात विसर्जनात कसलाही अडथळा होवू नये याकरिता पालिका प्रशासन पहिल्या दिवसापासून सज्ज आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात २३ तलावांच्या ठिकाणी विसर्जन होत असते. त्यापैकी वाशीतील तलाव विसर्जनाचे महत्वाचे ठिकाणी आहे. त्याठिकाणी शहरातल्या मोठ्या मुर्तींचे विसर्जन होत असते. विसर्जन होणारया मुर्तींमध्ये घरगुती तसेच सार्वजनीक मंडळाच्या पाच ते अकरा फुट उंचीच्या मुर्तींचा समावेश असतो. मात्र यंदा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वाशीतील तलावात विसर्जनाला अडथळा होणार आहे.या तलावांमध्ये प्रतीवर्षी गणेशमुर्तींचे तसेच देवींचे विसर्जन होत असते. यामुळे प्रतीवर्षी विसर्जन झाल्यानंतर तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. परंतु या कामात हलगर्जीपना दाखवत दोन वर्षांनी तलावातील गाळ काढण्याचे धोरण पालिका राबवत आहे. परिणामी वाशीतील तलावाचा गाळ दोन वर्षापासून न काढल्याने २० फुट खोलीच्या या तलावात १५ फुटापर्यंत गाळ साचला आहे. त्यामुळे उर्वरित ४ ते ५ फुटाच्या पाण्यातच यंदाच्या गणेशमुर्तीचे विसर्जन करावे लागणार आहे. त्याचा त्रास तलावाच्या ठिकाणी गणेशमुर्ती विसर्जनासाठी नेमलेल्या स्वयंसेवकांना होत आहे. पाच व सात दिवसाच्या गणेशमुर्तीचे विसर्जन झाल्यानंतर दहाव्या दिवशी विसर्जीत होणारया मुर्ती पाण्यात बुडण्याऐवजी तरंगताना दिसण्याची शक्यता आहे. सध्या तलावात साचलेल्या गाळावरुन पाच फुट उंचीचा कोणताही तरुण सहज चालत जावू शकतो. तसे प्रात्यक्षिक देखिल तलावाच्या ठिकाणी नेमलेल्या एका स्वयंसेकाने करुन दाखवले. गणेशमुर्तींचा गाळ पायाखाली तुडवावा लागत असल्याचा संतापही या स्वयंसेवकांनी व्यक्त केला आहे.
तलावातील गाळाचा अडथळा
By admin | Updated: September 22, 2015 03:50 IST