नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमाने आणि विमानतळांच्या सुरक्षेबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यात लवकरच शुभारंभ होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळावरील टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या मार्गात उघड्यावर होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसह विविध स्वरूपाच्या २२५ अडथळ्यांची नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअर मन’ यादी डीजीसीएच्या सूचनेनुसार जाहीर झाली होती. ही अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको, नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे. प्राणी कत्तलीची तक्रार नॅट कनेक्ट फांउडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
मे महिन्यात ‘नोटोम’लिस्टनुसार नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील २२५ अडथळे डीजीसीएने दूर करण्यास सांगितले होते. या अडथळ्यांचा मार्च २०२५ मध्ये विमानतळाचा समावेश भारताच्या एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) मध्ये केला होता. सुरक्षित विमान वाहतूक, संचलनासाठी आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्यांचा तपशील एआयपी नोंदीमध्ये दिला होता. यात धावपट्टीची लांबी, विमान पार्किंग, इंधन उपलब्धतासारख्या पायाभूत सुविधांचा उल्लेख असला, तरी विमानतळाजवळील २२५ संभाव्य अडथळ्यांचा मुद्दा होता.
यातील किती अडथळे दूर झालेत, हे गुलदस्त्यात असले तरी विमानतळ कंपनी आणि सिडकोने याबाबत कार्यवाही सुरू केली. यानुसारच अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीने उलवे, द्रोणागिरी, बेलापूर ते नेरूळ-सीवूड परिसरातील सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. टेरेसवरील मोबाइल टॉवर्स, पाण्याच्या टाक्यांसह इतर उंच अडथळू दूर करण्यास सांगितले आहे. एआयपीने २२५ अडथळे सांगितले तरी यात मोठे अडथळे जास्त नाहीत, असे अधिकाऱ्याने नाव न सांगता सांगितले.
असे आहेत २२५ अडथळेयामध्ये ८६ इमारती, ७९ टेकड्या, २३ पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स, १२ मोबाइल टॉवर्स, ८ फ्लडलाइट पोल यांचा समावेश होता. विमानांच्या सुरक्षित हालचालींसाठी हे अडथळे दूर करण्यास सांगितले.