नवी मुंबईतील दहिसर परिसरात शनिवारी पहाटे काही गोदामांना भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल ९ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग कशामुळे लागली, अद्याप याबाबत समजू शकलेले नाही. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरपाडा येथील इराणी मशिदीजवळील २५ ते ३० गोदामांना शनिवारी पहाटे १.०० वाजताच्या सुमारास आग लागली. गोदामांमध्ये डांबर, प्लास्टिक ड्रम, कॉम्प्रेसर यांसारख्या ज्वलनशील वस्तू होत्या. त्यामुळे आग झपाट्याने वाढली.
या घटनेची माहिती मिळताच ठाणे, कोपरखैरणे, सीबीडी बेलापूर, कळंबोली, नेरुळ आणि वाशी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग पुन्हा भडकू नये यासाठी शीतकरण ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली.