लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळारून पुढील महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीबरोबरही करार केला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न रेंगाळला आहे. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी लावून धरली आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत अनेक आंदोलने केली. विशेष म्हणजे या मागणीला अनुकूलता दर्शवत शासनाने विधानसभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्या हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
केंद्राकडे सतत पाठपुरावा
सध्या विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. पुढील महिनाभरात विमानतळाचे उद्घाटन करण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीने इंडिगो कंपनीबरोबर हा करार केला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात असल्याने प्रकल्पग्रस्तांत अस्वस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सर्वपक्षीय समितीने लावून धरली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला उद्घाटनापूर्वी शिक्कामोर्तब करावे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी आग्रह धरला जाणार आहे.-डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती