नवी मुंबई - दोन ट्रकच्या मधून दुचाकी काढण्याच्या प्रयत्न चालकाच्या जिवावर बेतला. या अपघातात मृताचा मित्र गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर रिलायन्ससमोरील पुलावर हा अपघात झाला आहे. ऐरोलीत राहणारा रमजान शेख (वय २०) हा मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मित्र सूरज माळी याच्यासह दुचाकीवरून चालला होता. यावेळी रमजान हा दुचाकी चालवत होता. त्यांची दुचाकी पुलावर आली असता समोरून जाणाऱ्या दोन ट्रकच्या मधून त्याने दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये ट्रकच्या मागील भागाचा रमजानला धक्का लागल्याने नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यावर पडली. त्यात रमजानच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज माळी हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मृत रमजानवर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो ऐरोली सेक्टर १ येथे राहणारा असून, डिलिव्हरी बॉयचे काम करत होता.