- नामदेव मोरे, नवी मुंबई
अमलीपदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. विशेष पथकाने चार महिन्यांमध्ये १९ अड्ड्यांवर धाडी टाकून तब्बल २३ किलो गांजा, एमडी पावडर व घातक मेथॅक्युलोन जप्त केले आहे. कुख्यात गांजामाफियांसह तब्बल ४ आरोपींना गजाआड केले असून, त्यामध्ये एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. देशात सर्वांत झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. जेएनपीटी बंदर, प्रस्तावित विमानतळ, ठाणे-बेलापूर, तळोजा व रसायनी औद्योगिक वसाहत, मेट्रोचे जाळे यामुळे नवी मुंबई महापालिकेसह पनवेल शहर महापालिका व उरण तालुका हे जगातील एक प्रमुख व्यापारी व शैक्षणिक केंद्र झाले आहे. भविष्यात मुंबई व ठाणे जिल्ह्यापेक्षा या परिसरातील लोकसंख्या वाढणार आहे. यामुळेच गुन्हेगारीविश्वाने या परिसरात लक्ष केंद्रित केले आहे. अमलीपदार्थ विक्रेत्यांनी येथे बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व उपआयुक्त दिलीप सावंत यांनी अमलीपदार्थविरोधी पथकाची स्थापना करून त्याची धुरा विनोद चव्हाण या धाडसी अधिकाऱ्यावर सोपविली आहे. चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक माया मोरे, उपनिरीक्षक अमित शेलार व राणी काळे यांच्यासह कॉन्स्टेबलचे विशेष पथक तयार करून अमलीपदार्थमुक्त नवी मुंबई अभियान सुरू केले आहे. शहरातील सर्व अड्ड्यांवर धाडसत्र सुरू केले. जून अखेरीस तळोजा परिसरात पहिली कारवाई करण्यात आली. ७ किलो ४०० ग्रॅम गांजासह २ आरोपींना अटक करण्यात आली. जुलै महिन्यामध्ये पथकातील सर्व सदस्यांना अमलीपदार्थ कायदा व कारवाईविषयी प्रशिक्षण देऊन महिन्याच्या अखेरपासून धाडी सुरू केल्या आहेत. एपीएमसी परिसरामध्ये गांजाच्या रोपांची लागवड करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीस अटक केली. एकूण तीन गुन्हे दाखल करून ४ आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना तरुण व धाडसी सहकाऱ्यांच्या मदतीने चार महिन्यांमध्ये शहरातील अमलीपदार्थमाफियांना तुरुंगात पाठविण्यात यश आले आहे. सर्वांत मोठे यश आॅगस्ट महिन्यामध्ये प्राप्त झाले. एका महिन्यामध्ये तब्बल ९ गुन्हे दाखल करून १२ आरोपी गजाआड केले. १० किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केला. यानंतर एमडी रॉक पावडर, मेथॅक्युलोनसह विदेशी रॅकेटचाही भांडाफोड केला आहे. पथकाची स्थापना झाल्यानंतर नवीन सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल २३ किलो गांजा हस्तगत करून २४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. १५ ते २० वर्षे कायदा खिशात असल्याचे भासवून गांजा विकणारे टारझन, पांडे याच्यासह अनेक माफियांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अनेक माफियांनी नवी मुंबईमधून पळ काढला आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकवून अमलीपदार्थांची तस्करी सुरूच ठेवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात पाठविले जात असून, पोलिसांच्या या कामगिरीचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. चार महिन्यांमध्ये तब्बल १९ गुन्हे दाखल करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव पोलीस आयुक्तालय असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या पथकाचे कौतुक केले आहे. जून : विशेष पथकाची स्थापना अमलीपदार्थविरोधी पथकाची स्थापना झाल्यानंतर काही दिवसांमध्येच तळोजामध्ये गांजा अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. ७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली. जुलै : गांजाची रोपे हस्तगतविशेष पथकाने जुलैमध्ये गांजा विक्री व सेवनप्रकरणी ३ गुन्हे दाखल करून ४ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गांजाची तीन रोपे व ६७० ग्रॅम वजनाचा पाला जप्त करण्यात आला. आॅगस्ट : विक्रमी कारवाई आॅगस्टमध्ये सर्वांत विक्रमी कारवाई झाली. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील ९ अड्ड्यांवर धाडी टाकल्या. १२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १० किलो २५५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. महिन्यामध्ये तब्बल १ लाख २४ हजार ३७० रुपये किमतीचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले. सप्टेंबर : एमडीसह मेथॅक्युलोनचा साठा हस्तगतपोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये २०१४नंतर गांजाव्यतिरिक्त इतर घातक अमलीपदार्थ सापडले नव्हते. सप्टेंबरमध्ये पोलिसांनी १ किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केलाच, शिवाय १७५ ग्रॅम एमडी रॉक पावडर व १२७ ग्रॅम मेथॅक्युलोन आइस रॉकचा साठा जप्त केला. अमलीपदार्थविरोधी पथकाची ही मोठी कामगिरी असून, महिन्यात एकूण ४ गुन्हे दाखल झालेत. आॅक्टोबर : एमडीसह गांजा हस्तगतआॅक्टोबर महिन्यात पोलिसांनी उरण परिसरात धाड टाकून साडेतीन किलो गांजा जप्त केला आहे. याशिवाय कोपरखैरणे परिसरामध्ये एमडी पावडरसह नायजेरियन नागरिकास अटक केली आहे. पथकाचे वैशिष्ट्यवरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पथकामधील पोलीस निरीक्षक माया मोरे वगळता इतर कोणालाही अमलीपदार्थविरोधी कारवाईचा काहीही अनुभव नव्हता. पूर्णपणे नवीन असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याची माहिती देण्यात आली. पथकातील सर्वच सदस्यांकडून टीमवर्क करून घेण्यामध्ये त्यांना यश आले आहे. चव्हाण यांनी यापूर्वी रेल्वे पोलीसमध्ये असताना चोरी व इतर गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड केला होता. आता नवी मुंबईमध्ये अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांनाही सळो की पळो करून सोडले आहे. पोलीस आयुक्त व सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगली टीम बांधण्यात यशस्वी झालो आहोत. शहरामधून अमलीपदार्थ विक्रेत्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनीच टीमवर्क करून मेहनत घेतल्यामुळे अनेक गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश आले आहे. - विनोद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक