लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील बसडेपोला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. या खड्ड्यांनी प्रवासी आणि बसचालक त्रस्त झाले आहेत. पावसाळ््यापूर्वी पालिका प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी केल्याने ऐन पावसाळ्यात या ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण झाले असल्याने प्रशासनाचा दिखाऊपणा उघडकीस आला आहे. खड्डे बुजविण्यासाठी केलेला खर्च खड्ड्यात गेला असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रवासी, चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डेपोतील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने बेस्टच्या वाहनचालकांच्या अतिघाईमुळे हे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. याबाबत तक्र ारी करूनही बेस्ट प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बेस्टच्या डेपोमध्ये काँक्रिटीकरण व डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्ते बनविताना कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याने डेपोतील रस्ते लगेच खराब होत आहेत. बसडेपोत आल्यानंतरही बेस्टचे वाहनचालक बस वेगात चालवत असतात. त्यामुळे खड्ड्यांतील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सीबीडी बसडेपोमध्ये खड्ड्यांच्या समस्येने प्रवासी हैराण झाले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी काही खड्ड्यांमध्ये खडी टाकून डांबराचा मुलामा चढवला आहे, तर काही ठिकाणी पेव्हरब्लॉक रचले आहेत. पावसामुळे डांबर वाहून गेले आहे. पेव्हरब्लॉक खड्ड्यातून उखडले असल्याने तीच परिस्थिती कायम राहिल्याने या कामासाठी केलेल्या महानगरपालिकेचा खर्च खड्ड्यांत गेला आहे. पाऊस नसला तरी या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना यातून मार्ग काढणे कठीण होते. डेपो परिसरात सध्या पुन्हा पावसामुळे खड्डे पडल्याने त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज चालकांना अनेकदा येत नाही. खड्ड्यांत अचानक बस गेल्याने प्रवासी पुढील आसनावर किंवा खिडक्यांवर आदळण्याचे प्रकार घडतात. तसेच खड्ड्यांतील साचलेले पाणी बाजूला बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना अंगावर झेलावे लागते.
बसडेपोतील खड्ड्यांनी प्रवासी हैराण
By admin | Updated: July 8, 2017 06:03 IST