लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : मुंबई-पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे, त्यामुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधब्यावर फिरायला-मजा करण्यासाठी येत असतात. मात्र मौजमजा करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी ७ जुलै रोजी तालुक्यातील सोनलपाडा धरणात तीन जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या धबधब्यावर व धरणावर दोन महिन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे दोन महिने पर्यटकांना या धबधब्यावर व धरणावर फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही.कर्जत तालुक्यात आषाणे- कोषाणे धबधबा, वदप, मोहिली, टपालवाडी, पेब, पळसदरी धबधबा असे लहान-मोठे अनेक धबधबे आहेत, तर सोलनपाडा, पळसदरी धरणे आहेत. या धबधब्यावर आणि धरणावर शनिवार, रविवार पर्यटकांचा महापूर येत असतो. तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभल्याने येथे येण्याचा आणि पाण्यात भिजण्याचा मोह आवरत नाही. मागील दोन-तीन वर्षांत तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटक मौजमजा करायच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. मागील दोन वर्षांत झालेल्या घटना पाहता कर्जत पोलीस ठाणे, आणि नेरळ पोलीस ठाणे यांनी झालेल्या घटनांचा अहवाल तहसील कार्यालयात पाठवला. हा अहवाल प्रांत कार्यालयाला आला होता. दरम्यान, शुक्रवारी तिघे जण सोलनपाडा येथे बुडाल्याची घटना समोर ठेवून तालुक्यातील महत्त्वाची ठिकाणे आणि धोक्याची ठिकाणे धबधबे, तलाव येथे पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. प्रतिबंधात्मक आदेश शुक्रवारी ७ जुलैपासून ६ सप्टेंबर २०१७ असा दोन महिन्यांसाठी लागू केला असल्याची माहिती प्रांत दत्ता भडकवाड यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील धबधब्यांवर जाण्यास बंदी
By admin | Updated: July 8, 2017 05:52 IST