ऑऩलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेल्या प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडत 'आप' म्हणजे 'खाप' पंचायत बनली असल्याचा टोला हाणला आहे. आम आदमी पक्षामध्ये हुकूमशहा असून सर्वांना त्याचेच म्हणणे ऐकावे लागते. त्या एका नेत्यासाठी पक्षातील अन्य नेते वाट्टेल ते करू शकतात अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. पक्षविरोधात कारवाई करण्याचा ठपका ठेवत आम आदमी पक्षाने बंडखोर नेते प्रशांत भूषण यांची हकालपट्टी केली. भूषण यांच्यासह योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांनाही पक्षातून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या या चौघांना पक्षाने शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे पक्षाने सोमवारी रात्री उशीरा काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले.
दरम्यान प्रशांत भूषण यांचे वडील व आपचे नेते शांती भूषण यांनीही केजरीवालांवर कडडाडून टीका केली आहे. आपण हिटलर आहोत हे केजरीवाल यांनी सिद्ध केले असून मी त्यांना ओळखण्यात अपयशी ठरलो असे भूषण यांनी म्हटले आहे. प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे भडकलेल्या शांती भूषण यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी केजरीवाल यांचे खरे रंग ओळखू शकलो नाही, असेही ते म्हणाले. तसेच स्वराज संवादमध्ये मी पण उपस्थित होतो, माझी कारणे दाखवा नोटीस कुठे आहे, असा सवालही त्यांनी केला.