जगदीप धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदावर नव्या व्यक्तीची निवड करण्यासाठीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडूक झाली तर त्यात कुणाचं पारडं जड असेल, मतांच्या आकडेवारीत बाजी मारून कोण विजयी होईल, याचे अंदाज राजकीय वर्तुळातून बांधले जात आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतात. सध्या लोकसभेमध्ये सरकारकडे काठावरचं बहुमत आहे. तर राज्यसभेत काय परिस्थिती आहे हे आपण पाहुयात.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून होते. त्यात लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतात. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्यही मतदान करण्यास पात्र असतात. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणे यात विधानसभांचे आमदार मात्र मतदान करत नाहीत. मतदान गुप्त मतदान पद्धतीनं होतं. तसेच उमेदवाराला विजय मिळवण्यासाठी ५०% अधिक १ मत मिळवणं आवश्यक असतं.
आता सध्याचं संसदेतील गणित पाहिल्यास लोकसभेमध्ये एकूण ५४३ जागांपैकी एक जागा रिक्त असल्याने ५४२ सदस्य मतदार आहेत. तर राज्यसभेमध्ये २४५ पैकी ५ जागा रिक्त असल्याने एकणू २४० सदस्य मतदार आहेत. त्यामुळे एकूण मतांची संख्या ही ७८२ एवढी आहे. तसेच विजय मिळवण्यासाठी ३९२ मते मिळवणं आवश्यक आहे.
सद्यस्थितीत लोकसभेमध्ये सत्ताधारी एनडीएला २९३ सदस्यांचा पाठिंबा आहे. तर राज्यसभेमध्ये एनडीएला १२९ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर काही सदस्यही त्यांना पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे एनडीएला पाठिंबा असलेल्या सदस्यांची संख्या ४५७ पर्यंत पोहोचले. ही संख्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ३९२ या आकड्यापेक्षा ६५ ने अधिक आहे. तर विरोधी पक्षांकडे लोकसभा आणि राज्यसभेत मिळून ३२५ सदस्यांचं संख्याबळ आहे. हा आकडा विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा फार कमी आहे. त्यामुळे सद्यस्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएच्या उमेदवाराचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे.