नवी दिल्ली : आजच्या भारतीयांच्या आनुवंशिक रचनेचा उगम कुठे आहे, यावर महत्त्वपूर्ण शोधाचा खुलासा झाला आहे. भारतीयांची उत्पत्ती नवपाषाणकालीन इराणी शेतकरी, युरेशियन स्टेपीमधील पशुपालक, आणि दक्षिण आशियातील आदिम शिकारी या तीन मानवसमूहांपासून झाली आहे, असे दिल्लीतील एम्स आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील शास्त्रज्ञांच्या संयुक्त संशोधनातून समोर आले आहे. सर्वाधिक आनुवंशिक वैविध्य आढळते भारतीयांत
या संशोधनानुसार, जगभरातील गैर-अफ्रिकन लोकांमध्ये भारतीयांमध्ये सर्वाधिक आनुवंशिक विविधता आढळते. संशोधक प्रिया मूरजानी (कॅलिफोर्निया विद्यापीठ) यांनी सांगितले की, हजारो वर्षांतील स्थलांतर, सामाजिक रचना आणि मानवी संपर्क यांमुळे भारतीयांच्या जनुक रचनेवर मोठा प्रभाव पडला आहे.
आजच्या काळातील आरोग्यावर कोणता होतो परिणाम?
या प्राचीन मानवसमूहांकडून वारशाने मिळालेली ही जनुकीय माहिती भारतीय लोकांची रोगप्रतिकारशक्ती कशी घडते, कोणते आजार भारतीयांना अधिक होतात यावर प्रकाश टाकते. त्यामुळे भविष्यात संपूर्ण भारतीय उपखंडासाठी अधिक प्रभावी वैद्यकीय उपाययोजना आखता येऊ शकतील.
रक्तात कुणाचा वारसा अधिक?
भारतीयांच्या गुणसूत्रांच्या अभ्यासात एक चित्तथरारक बाब समोर आली ती ही की, भारतीयांमध्ये निएंडरथल आणि डेनिसोवन या लुप्त झालेल्या प्राचीन मानवप्रजातींचे गुणधर्म आजही मोठ्या प्रमाणात आहेत. निएंडरथल हे मानवाशी अगदी जवळच्या पण आता लुप्त झालेल्या प्रजातीचे प्रतिनिधी आहेत. ते चाळीस ते चार लाख वर्षांपूर्वी मध्य आशियामध्ये राहत होते.
शास्त्रज्ञ लॉरिट्स स्कोव यांच्या मते, भारतीयांच्या डीएनए नमुन्यांमधून ५० टक्के निएंडरथल आणि २० टक्के डेनिसोवन गुणसूत्रांची पुनर्रचना करण्यात संशोधक यशस्वी झाले. डेनिसोवन हा प्राचीन मानवी समूह प्रामुख्याने आशियात होता आणि निएंडरथलप्रमाणेच २०,००० ते ५०,००० वर्षांपूर्वी ते नामशेष झाले.
भारतीयांच्या आनुवंशिक इतिहासातील अनेक रहस्यांवर प्रकाश
हे संशोधन प्रसिद्ध ‘सेल’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून, यामुळे भारतीयांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आनुवंशिक इतिहासातील अनेक रहस्यांवर प्रकाश पडतो. नवपाषाण काळात शेतीची सुरुवात झाली व मानवाने दगडी हत्यारे, उपकरणांचा वापर करण्यास सुरुवात केली होती.