नवी दिल्ली : भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी औपचारिक पदभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली़ आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध हवेत; पण यासाठी पाकने आपल्या भूमीवरून होणार्या अतिरेकी कारवाया थांबवाव्यात, असे मोदींनी शरीफ यांना सुनावले़ हैदराबाद हाऊस येथील सुमारे ५० मिनिटांच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी शरीफ यांच्यासमक्ष दहशतवाद, मुंबई हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करीत उभय देशातील संबंध दृढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली़ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यावेळी उपस्थित होत्या़ द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा सुरू राहील, यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली़ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी सांगितले की, शरीफ यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला़ पाक भूमीवरून भारतात होणार्या अतिरेकी कारवायांवर अंकूश ठेवण्याची प्रतिबद्धता पाकिस्तानने निभवावी, असे मोदींनी शरीफ यांना सांगितले़ २६/११ च्या मुंबई हल्ल्यासंदर्भात अतिशय संथ सुरू असलेल्या पाकिस्तानातील न्यायालयीन प्रक्रियेवर मोदींनी विशेष चिंता व्यक्त केली़ याशिवाय परस्पर व्यापार संधींवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली़ मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारण्यास पाकमधील कट्टरवादी तत्त्वांनी नाराजी व्यक्त केली होती़ ही नाराजी अव्हेरून शरीफ भारतात आले व मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात सामील झाले़ या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे़ मोदींसोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ शांती व सुरक्षेसाठी उभय देशांना आरोप-प्रत्यारोपाऐवजी संवाद वाढविण्याची गरज आहे़ भारताच्या नवनियुक्त पंतप्रधानांसोबतची आजची चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली़ आजच्या भेटीतील हेच सौहार्द कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव लवकरच भेटतील़ उभय देशात विविध मुद्यांवरील चर्चा निरंतर व सकारात्मकरीत्या पुढे चालावी, यासाठीचे हे प्रयत्न असल्याचे शरीफ यावेळी म्हणाले़
मैत्री हवी; पण दहशतवाद रोखा
By admin | Updated: May 28, 2014 03:30 IST