ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १२ - ईदच्या नमाजपठणानंतर काश्मीर खो-यात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. नमाजपठणानंतर ऐतिहासिक मशिदींबाहेर एकत्र जमण्यावर प्रशासनाने बंदी घातली असून, १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दशकभरामध्ये पहिल्यांदाच काश्मीरमध्ये ईदच्यावेळी अशा प्रकारची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे ईदचा उत्साह फारसा दिसत नसून, सार्वजनिक ठिकाणे, बाजार ओस पडल्याचे चित्र आहे.
दोन महिन्यांपासून काश्मीर खो-यात सुरु असलेल्या हिंसाचारा विरोधात श्रीनगरमध्ये सकाळी हजारो नागरीकांनी शांती मोर्चा काढला होता. उत्तरकाश्मीरात बांदीपोरामध्ये सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत एक युवक ठार झाला. अनंतनागमध्ये अशाच प्रकारच्या हिंसाचारात अनेकजण जखमी झाले. संचारबंदी असलेल्या जिल्ह्यांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.