नवी दिल्ली : अमेरिका-इराण युद्धामुळे देशभरात गंभीर गॅस टंचाई निर्माण झाली असून, देशभरात गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्य नागरिकांनी बुधवारीही भरउन्हात रांगा लावल्या. पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच रांग लावली होती. सिलिंडर संपल्याने राज्यातील ४० टक्के हॉटेल्स बंद पडले असून, काही हॉटेलचालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली. केंद्र सरकारने मात्र देशात एलपीजी सिलिंडरची कोणतीही कमतरता नसून ग्राहकांनी घाबरून जाऊन आगाऊ बुकिंग करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात ४ ते ५ हजारावर पोहोचला आहे. अनेक हॉटेल्सनी आपल्या मेन्यू कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली असून, कमी गॅस लागणाऱ्या पदार्थांवर भर दिला जात आहे.
केंद्र सरकार काय म्हणते?
घरगुती एलपीजीचा पुरवठा सध्या अडीच दिवसांच्या सामान्य पातळीवर स्थिर आहे. चुकीच्या माहितीमुळे काही ठिकाणी साठेबाजीचे प्रकार समोर येत आहेत, मात्र सरकार त्यावर लक्ष ठेवून असून, राज्य सरकारांना काळाबाजार रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी प्रयत्नांमुळे एलपीजी उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. पुढच्या काही दिवसांत एलएनजीचे दोन मोठे टँकर भारतात पोहोचणार असून, यामुळे एलपीजी टंचाई कमी होईल, असे पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे.
इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा : मोदी
पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे; परंतु देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नोटाबंदी, कोरोनातही परिस्थिती गंभीर नसल्याचे सांगितले गेले; पण देशाने मोठे संकट अनुभवले. आताही भारताकडे ७४ दिवसांचा तेलसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी परिस्थिती गंभीर आहे. मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
इराणची ताकद संपली; युद्ध लवकरच थांबेल : ट्रम्प
अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणमध्ये लक्ष्य करण्यासारखे फारसे काही उरलेले नाही आणि हे युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तेल २०० डॉलरवर जाणार
कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जातील आणि शत्रू राष्ट्रांकडे जाणारे प्रत्येक जहाज आमचे लक्ष्य असेल, असा कठोर इशारा इराणच्या लष्करी कमांडने दिला आहे.
तेलावरून पुन्हा घसरला भारतातील शेअर बाजार
युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय शेअर बाजार घसरला. बुधवारी झालेल्या घसरणीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ५.१४ लाख कोटी रुपयांची घट झाली. सेन्सेक्स १,३४२.२७ अंकांनी घसरून ७६,८६३.७१ अंकांवर बंद झाला. रुपया डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी कोसळून ९२.०१ वर बंद झाला.
Web Summary : Gas shortage grips India amid US-Iran tensions. Citizens face long queues for cylinders, impacting hotels. Black market prices surge. Government assures supply, blames hoarding, and expects relief soon. Oil price hikes triggered stock market fall.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच भारत में गैस की किल्लत। नागरिक सिलेंडर के लिए लंबी कतारों का सामना कर रहे हैं, जिससे होटल प्रभावित हैं। कालाबाजारी में कीमतें बढ़ीं। सरकार ने आपूर्ति का आश्वासन दिया, जमाखोरी को जिम्मेदार ठहराया और जल्द राहत की उम्मीद जताई। तेल की कीमतों में वृद्धि से शेयर बाजार में गिरावट आई।