अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना कॅनडामध्ये आयोजित जी7 शिखर परिषदेतून परतताना काही वेळासाठी अमेरिकेत थांबण्याची विनंती केली. मात्र, पंतप्रधान मोदींनी यासाठी नकार दिला. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, फोनवरील हे संभाषण जवळपास 35 मिनिटे चालले. दरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली.
परराष्ट्र सचिव म्हणाले, "आपण कॅनडातून परतताना अमेरिकेत येऊ शकता का? असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारले होते. यावर पंतप्रधान मोदी यांनी पूर्व निर्धारित कार्यक्रमांचा हवाला देत असमर्थता व्यक्त केली. खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. सायप्रस येथून ते कॅनडा येथे जी७ परिषदेत भाग घेण्यासाठी गेले होते. यानंतर ते क्रोएशियाला गेले.
ट्रम्प यांच्यासोबत स्पष्टच बोलले - ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारताने केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईवर प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामासाठी कुठल्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी अथवा भारत-अमेरिका व्यापार कराराची कोणतीही भूमिका नव्हती.
ऑपरेशन सिंदूर आणि भारताची बूमिका - पाकिस्तानी दहशतनादी 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने 7 मे रोजी पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूरला सुरूनात केली होती. या कारवाईत भारताने पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना निशाणा बनवले होते. यासंदर्भात टम्प यांना माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताची कारवाई अत्यंत "संतुलित, अचूक आणि तनावही वाढणार नाही," अशा प्रकारची होती. याशिवाय, भारताने नेहमीच दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
भारताने मध्यस्थीची शक्यता फेटाळली -ट्रम्प यांच्यासोबतच्या या संभाषणादरम्यान, मोदी म्हणाले, भारताने कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही कधी स्वीकारणार नाही. तत्पूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामासाठी अमेरिकेची भूमिका होती, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, भारताने हे दावे फेटाळून लावले आणि युद्धविराम दोन्ही देशांच्या परस्पर संमतीने झाला, ज्यात कुठल्याही बाह्य शक्तीची मध्यस्थी नव्हती, असेही मोदी म्हणाले.