जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीना काही समस्या असतात. पण, काहींच्या समस्या अशा असतात की, ज्या ऐकून समोरच्यालाही कपाळावर हात मारून घ्यावा वाटतो. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधून समोर आला आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथे सुरू असलेल्या एका सार्वजनिक सुनावणीत एक अत्यंत अनपेक्षित आणि तितकीच धक्कादायक घटना घडली. जिल्हाधिकारी ऋषभ कुमार गुप्ता यांच्यासह सर्व उच्च अधिकारी उपस्थित असताना, एका भिकाऱ्याने अशी तक्रार केली की ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्काच बसला.
नेमकी काय आहे तक्रार?शफीक शेख नावाचा एक दिव्यांग भिकारी सुनावणीत पोहोचला. त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्याला दोन पत्नी आहेत आणि त्या दोघी सतत भांडत असल्याने त्याच्या भिक मागण्याच्या कामावर परिणाम होत आहे. शफीकने म्हटले की, त्याला दोन्ही पत्नींना सोडायचे नाही, उलट त्यांना एकाच छताखाली एकत्र राहायला शिकवायचे आहे.
कलेक्टरही झाले अवाक!शफीकचे हे म्हणणे ऐकून जिल्हाधिकारी ऋषभ कुमार गुप्ता यांना धक्का बसला. जनसुनावणीसाठी उपस्थित असलेले इतर विभागांचे अधिकारीही काही काळ स्तब्ध झाले. शफीकने सांगितले की, त्याचे पहिले लग्न २०२२ मध्ये शबानासोबत झाले होते, तर दुसरे लग्न २०२४ मध्ये फरीदासोबत झाले. शफीक अंध असून, तो खंडवा आणि महाराष्ट्रादरम्यान धावणाऱ्या ट्रेन आणि बसमध्ये भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो.
उत्पन्नावर होतोय परिणामशफीकच्या म्हणण्यानुसार, तो भीक मागून दररोज दोन ते तीन हजार रुपये कमावतो आणि दोन्ही पत्नींची काळजी घेण्यास तो सक्षम आहे. परंतु, त्यांच्यातील सततच्या भांडणामुळे त्याला भीक मागण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या कमाईवर परिणाम होत आहे. म्हणूनच, त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणात हस्तक्षेप करून पत्नींना समजावण्याची विनंती केली.
कलेक्टरचा अनोखा उपायभिकाऱ्याची ही अनोखी तक्रार ऐकून जिल्हाधिकारी सुरुवातीला काही क्षण स्तब्ध झाले, पण नंतर हसत हसत त्यांनी हे प्रकरण महिला आणि बालविकास विभागाकडे चौकशीसाठी पाठवले. शफीकच्या दोन्ही पत्नींना बोलावून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी दिले.