बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील महिसोर पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये नववधूचाही समावेश आहे. कुटुंबाला या घटनेची माहिती मिळताच मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे महिसर पोलीस स्टेशन परिसराती जंदाहा-समस्तीपूर मुख्य रस्त्यावर पनसलवा चौकात कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये बिदुपूर पोलीस स्टेशन परिसरातील पानापूर कुशियारी येथील रहिवासी क्रांती कुमार यांची पत्नी बबिता देवी, त्यांची ८ वर्षांची मुलगी सोनाक्षी कुमारी, गणेश राय यांची पत्नी मोना देवी आणि नववधूचा समावेश आहे.
अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक लग्न समारंभानंतर वधूसोबत परतत होते आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी वधूचा अपघातात मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.