भारतीय हवाई दलासोबत धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलाचे विमान जे म्यानमारलाभूकंप पीडितांसाठी मदत घेऊन गेल होते, त्यावर सायबर हल्ला करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीत इस्रायल आपल्यावरील हल्ले चुकविण्यासाठी जीपीएस प्रणालीवर सायबर हल्ले करत असल्याचे वृत्त आले होते. तसाच हल्ला या विमानावर हवेत असताना करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान म्यानमारला निघाले होते, पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी हवेत असताना या विमानावर सायबर हल्ला करण्यात आला. याद्वारे या विमानाचा मार्ग भटकविण्यात येत होता. सायबर हल्लेखोर जर यामध्ये यशस्वी झाले असते तर भारतीय विमान वेगळ्याच मार्गावर निघाले असते. कदाचित मार्ग भटकल्यामुळे संकटातही सापडले असते. विमानांमध्ये जर इंधन कमी असले असते आणि जर असा हल्ला झाला असता तर हवेतच इंधन संपण्याचा धोका असतो. परंतू, हवाई दलाच्या पायलटनी हा सायबर हल्ला परतवून लावला आणि विमान सुरक्षित स्थळी उतरविले.
म्यानमारच्या हवाई हद्दीत भारतीय हवाई दलाच्या विमानांवर सायबर हल्ला झाला होता. विमानांचे जीपीएस सिग्नल स्पूफ करत वेगळेच जीपीएस कोऑर्डिनेट्स दाखविले जात होते. यामागे नेमके कोण होते, हे शोधणे कठीण असले तरी गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल असे करत असल्याचा नुकताच अहवाल आला होता. यामुळे पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर सीमेवर विमानांचा गोंधळ उडत आहे. अशातच हा ताजा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
भारताचे हवाई दलाचे विमान दुसऱ्याच देशाच्या हद्दीत घुसल्याने विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाकिस्तान, चीन किंवा तुर्की सारखे जे देश आहेत, त्या देशांमध्ये गेल्यास परिस्थिती चिघळू शकते. यामुळे हवाई दल सावध झाले आहे. म्यानमारमध्ये चीनचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढत आहे. तसेच अनेक बंडखोर संघटनादेखील आहेत. भारतीय पायलटनी जीपीएस सिग्नलमध्ये गडबड असल्याचे दिसताच लगेचच बॅकअप सिस्टीमचा वापर केला. या विमानांमध्ये नर्शियल नेविगेशन सिस्टम(INS) देखील इन्स्टॉल होती, त्याच्या आधारे हे विमान योग्य दिशेने नेण्यात आले.