तेलंगणात भारत राष्ट्र समितीमध्ये अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. एकीकडे बीआरएस रौप्य महोत्सव साजरा करत आहे तर दुसरीकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव आणि त्यांची बहीण के. कविता यांच्यात उत्तराधिकारी कोण यावरून वाद रंगला आहे. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्ष अनेक मुद्द्यावर झगडत आहे. ज्यात आमदार पक्ष बदलून काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे पक्ष कायदेशीर लढाईही लढत आहे.
सूत्रांनुसार, पक्षावर कुणाचे नियंत्रण असणार, कमान कोणाच्या हाती द्यायची यावरून कुटुंबात घमासान सुरू आहे. उत्तराधिकारी लढाई तेव्हाच सुरू होते जेव्हा पक्षाचा सुप्रीमो बाहेर पडतो परंतु बीआरएसमध्ये सत्तेची लढाई तेव्हाच सुरू झाली जेव्हा के. चंद्रशेखर राव अद्यापही राजकारणात सक्रीय आहेत. पक्षात केसीआरचे नातेवाईक आधीच दोन गटात विभागले गेलेत. काही केटीआर तर काही के.कविता यांचे समर्थन करत आहेत. माजी खासदार आणि विद्यमान आमदार कविता यांनी वारंगलच्या बीआरएस रजत जयंतीला सार्वजनिक बैठकीत केसीआर यांच्या भाषणाबाबत त्यांना फिडबॅक पत्र लिहिले त्यातून हा वाद चव्हाट्यावर आला. TOI ने ही बातमी दिली आहे.
या पत्रात केसीआर यांनी भाषणात भाजपाला टार्गेट न करणे, मागासवर्गीय आरक्षणावर भाष्य न करणे याशिवाय बीआरएस नेते आणि त्यांच्या वागणुकीवर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या दोघांमधील वाद १ वर्षापूर्वीच समोर आले. मागील काही महिन्यापासून हा वाद आणखी वाढला आहे. केटीआर यांनी कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून कविता यांना मोठी जबाबदारी मिळाली नाही. त्यांना निजामाबाद पुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. मागील १ वर्षापासून त्यांना पक्षाकडून दुर्लक्षित करण्यात येत आहे असं कविता यांचे समर्थक सांगतात.
कविता नाराज का?
कविता या केटीआरसह पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्या बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी होतील अशी चर्चा होती. त्यावर अनेक नेत्यांनी मौन बाळगले. कुठल्याही पक्षातील नेत्यांनी या अफवेचे खंडन केले नाही. ही बातमी पसरताच केटीआर हरिश राव यांच्या घरी पोहचले तिथे पक्षातील नेत्यांसोबत बैठक घेतली. केटीआर यांनी हरिश राव यांच्यासोबत मतभेद संपवले आणि एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. परंतु कविता यांच्या प्रकरणी भाऊ केटीआर यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही.