नवी दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यावर शहराचा समग्र विकास शक्य होईल़ विकासाच्या मार्गातील अनेक बाधा आपोआप दूर होतील़ म्हणूनच नव्या पंतप्रधानांसमक्ष आपण सर्वप्रथम दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करू, असे दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन म्हणाले़ रविवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही भूमिका बोलून दाखवली़ पूर्वाश्रमीच्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणारे विधेयक आणले होते़ ते संसदेतही मांडले होते़ तथापि काँग्रेसच्या आक्षेपानंतर ते संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते़ रालोआ सत्तेतून गेल्यावर काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने या विधेयकाची कुठलीही दखल घेतली नाही़ मोदींच्या नेतृत्वाखालील नवे सरकार दिल्लीकरांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असे हर्षवर्धन यावेळी म्हणाले़ पाण्याची टंचाई, दिल्ली मास्टर प्लान २०२१ आदी मुद्यांकडे आम्ही नव्या सरकारचे लक्ष वेधू, असेही त्यांनी सांगितले़ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत भाजपाने सत्तेत आल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीला पूर्ण राज्याचा मुद्दा उचलू
By admin | Updated: May 25, 2014 23:54 IST