गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काही काही महिन्यांनी बदलत आहेत. माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच नोव्हेंबर २०२४ ला निवृत्ती घेतली होती. त्यांच्याजागी सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आले होते. पाच महिने होत नाही तोच त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे.
यामुळे सर्वोच्च न्यायालयाची धुरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात जाणार आहे. खन्ना यांनी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. यामुळे गवई हे ५२ वे सरन्यायाधीश बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डीवाय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.
भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. ते २००३ पासून ते २०१९ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत.
बीआर गवई हे येत्या १४ मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. सध्या तेच सर्वात वरिष्ठ जज आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गवईंना शपथ देणार आहेत. गवई देखील फार काळ सरन्यायाधीश पदी राहणार नाहीत. ते जवळपास सहा महिनेच या पदावर असणार आहेत. गवई हे नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. २०१९ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते. भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. ते १६ मार्च १९८५ रोजी बारमध्ये सामील झाले.