पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तानबदद्ल प्रचंड चीड असून भारताची देवभूमी समजल्या जाणाऱ्या केरळ राज्यातील नागरिकांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत केले आहे. याच आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे समर्थन तसेच भारतीय सैन्याबाबत अपशब्द वापरले होते. त्याचेच स्वागत केरळीयन करत असल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
केरळीयन समुदायाकडून दुबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या केरळच्या नागरिकांनी आफ्रिदीला पाहुणा म्हणून बोलविले होते. आफ्रिदी येताच या लोकांनी जोरजोरात ओरडत त्याचे स्वागत करण्यास सुरुवात केली. आफ्रिदी पोहोचताच उपस्थितांनी बुम-बुमचे नारे लावले आणि जल्लोष करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहून भारतीय लोक चिडले आहेत आणि भारताचेच राज्य असून पाकिस्तानी क्रिकेटर तो सुद्धा भारताविरोधात गरळ ओकणाऱ्याचे असे स्वागत केले जात असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी केरळीयन लोकांना सुनावण्यास सुरुवात केली आहे.
या कार्यक्रमात आफ्रिदीने त्याला केरळ राज्य आणि तेथील जेवण खूप आवडत असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर भारतीयांनी केरळीयन लोकांना ऐकविण्यास सुरुवात केली आहे. लज्जास्पद बाब आहे! देशभक्ती कुठे गेली यांची, असा सवाल काहींनी विचारला आहे. तर आयोजकांनी कोणत्याही भारतीयाला का बोलावले नाही, असा सवालही विचारण्यात आला आहे. शाहिद आफ्रिदीला कोणत्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
काश्मीरमध्ये तुमच्याकडे ८,००,००० सैन्य आहे आणि हे अजूनही घडत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नसाल तर तुम्ही अकार्यक्षम आणि निरुपयोगी आहात, असे पहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदीने भारतीय सैन्याबदद्ल म्हटले होते. तसेच त्यापूर्वी एप्रिलमध्ये त्याने "भारतात फटाके फुटले तरी पाकिस्तानकडे बोटे नेहमीच उचलली जातील", असेही म्हटले होते. आफ्रिदी नेहमीच भारताचा दु:स्वास करत आला आहे. अशा व्यक्तीला भारतातील नागरिकांनी कार्यक्रमाला बोलविणे आणि त्याचे स्वागत करणे हे भारतीयांना काही रुचलेले नाही.