Russia-Ukraine : मागील अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. सध्या युद्धाची दाहकता कमी झाली असली तरी, अधुन-मधून दोन्ही बाजूने हल्ले केले जातात. दरम्यान, या युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या युद्धात किमान 12 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण रशियन सैन्य दलात सेवा देत होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी(17 जानेवारी) ही माहिती दिली.
16 भारतीय अद्याप बेपत्ताभारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या भारतीय नागरिकांची 126 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी 96 लोक भारतात परतले आहेत, रशियन सशस्त्र दलातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण, अजूनही 18 भारतीय नागरिक रशियात असून, त्यापैकी 16 बेपत्ता आहेत. रशियाने त्यांना बेपत्ता घोषित केले आहे. आम्ही इतरांची तात्काळ सुटका आणि मायदेशी परत पाठवण्याची मागणी करत आहोत.
केरळच्या तरुणाचा मृत्यूया आठवड्याच्या सुरुवातीला युद्धात सामील असलेल्या केरळमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच, त्याचा नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. दोघेही केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी आहेत. बिनिल टीबी असे मृताचे नाव आहे, तर जैन टीके असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. बिनिलच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना जयस्वाल म्हणाले की, बिनील टीबीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जखमी झालेल्या जैनवर मॉस्कोमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण करून तो लवकरच भारतात परतेल, अशी अपेक्षा आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांच्या सुटके मागणी केलीअनेक भारतीय तरुण रशियाच्या लष्करी सहाय्य सेवेत इलेक्ट्रिशियन, कुक, प्लंबर आणि ड्रायव्हर म्हणून काम करण्याच्या आशेने एप्रिलमध्ये रशियाला गेले होते. जयस्वाल म्हणाले की, आम्ही दिल्लीतील रशियन दूतावासाकडे या प्रकरणाची चर्चा केली आहे. आम्ही उर्वरित भारतीय नागरिकांची लवकर सुटका करण्याच्या आमच्या मागणीचाही पुनरुच्चार केला आहे. सर्व भारतीय लवकरच परत येतील अशी आशा आहे.