नवी नोकरी मिळाल्यानंतर तिथलं काम आणि ऑफीसमधील वातावरण न आवडल्यास तातडीने तिथलं काम सोडून देण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. दरम्यान, नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच एका दिवसातच नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये खुशी चौरसिया म्हणाल्या की, आमच्याकडे सेल्स रोल जॉईन करण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कामाचा पहिला दिवस संपल्यानंतर मला एक मेसेज केला. तसेच मला हे काम आवडलेलं नाही असं सांगितलं. त्यानंतर हे काम आव्हानात्मक असल्याचं मी मान्य केलं. तसेच कामातील सर्व बाबींबाबत सदर कर्मचाऱ्याला मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर कल्पना देण्यात आली होती.
या घटनेनंतर नव्या नोकरीच्या शोधात असलेल्या नव्या उमेदवारांना एचआरने सवाल विचारला आहे. एका रात्रीत काय बदललं? कुठलंही काम एका दिवसात एकदम चांगलं होत नाही. कुठलीही कंपनी २४ तासांमध्ये सर्व काही सिद्ध करून दाखवू शकत नाही. तसेच जोपर्यंत तुम्ही आपली वेळ, शक्ती आणि मानसिकता एखाद्या कामासाठी खर्ची घालत नाही, तोपर्यंत कुठलंही काम आरामदायी वाटणार नाही.
तसेच उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान आणि नोकरीची ऑफर स्वीकारण्यापूर्वी थोडा वेळ घेऊन आपण हे काम करू शकतो की नाही याबाबत विचार केला पाहिजे सल्लाही या एचआरने दिला. त्यासोबतच नोकरी सोडाचयी असेल तर उमेदवारांना व्यावसायिक दृष्टीकोनातून आपलं म्हणणं मांडला आलं पाहिजे. तसेच विकास हा योग्य नोकरीमधून नव्हे तर धैर्य, स्पष्टता आणि असुविधांमधून शिकून होतो, असेही या एचआरने सांगितले.
दरम्यान, आपल्या या पोस्टमधून सदर एचआरने सदर कर्मचाऱ्यासोबत झालेल्या चर्चेचेही काही स्क्रीनशॉटही शेअर केले होते. तसेच त्यावर समाजमाध्यमांमधील वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत.