लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेजची मागणी केली आहे. 'ज्याठिकाणी पाकिस्तानी गोळीबारात ४ मुलांसह १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले, पूंछमधील त्या ठिकाणाला मी अलिकडेच भेट दिली होती", असंही या पत्रात म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, या अचानक आणि अंदाधुंद हल्ल्यामुळे सामान्य भागात प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो घरे, दुकाने, शाळा आणि धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक पीडितांनी सांगितले की त्यांचे वर्षानुवर्षे केलेले कष्ट एकाच झटक्यात वाया गेले.
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की, पूंछ आणि इतर सीमावर्ती भागातील लोक गेल्या अनेक दशकांपासून शांततेत आणि बंधुत्वाने राहत आहेत. आज, जेव्हा ते या गंभीर संकटातून जात आहेत, तेव्हा त्यांचे दुःख समजून घेणे आणि त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. "मी भारत सरकारला पूंछ आणि पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या इतर सर्व भागांसाठी एक ठोस आणि उदार मदत आणि पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची विनंती करतो, असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वीच पूंछला भेट दिली
खासदार राहुल गांधी यांनी नुकतीच जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारातील पीडितांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांचे दुःख 'मोठे दुःख' असल्याचे वर्णन केले आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.