लग्नानंतर पत्नीसोबत मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी याची हत्या त्याचीच पत्नी सोनम हिने केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामधून उघड झाली आहे. या प्रकरणी सोनम आणि इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, राजा रघुवंशी याची झालेली हत्या आणि लग्न ठरवताना घ्यायची खबरदारी यावरून सध्या समाजात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यातच राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेल्या एका सल्ल्यावरून वाद निर्माण झाला आहे.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोहन यादव म्हणाले की, राजा रघुवंशी हत्या प्रकरण हे समाजासाठी एक धडा आहे. विशेषकरून जेव्हा आपण मुलांचं लग्न ठरवतो, तेव्हा काही गोष्टींची सखोल माहिती घेणं आवश्यक आहे. तसेच विवाहानंतर मुलांना हनिमूनसाठी लांब पाठवणं योग्य नाही. आपण जुन्या काळातील परंपरांकडे वळण्याची आवश्यकता आहे. तसेच आपण मुलांवर नजर ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.