झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात मोठा हिंसाचार झाला आहे. होळीच्या सेलिब्रेशनवेळी दोन समजांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले असून तीन दुकानांना आग लावण्यात आली आहे.
या हिंसाचारानंतर पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले. घोडाथांबा येथून जात असलेल्या होळीच्या मिरवणुकीला एका समाजाने विरोध केला. यानंतर येथे दोन्ही गटात हिंसाचार झाला. एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. काही वाहनांना आगीही लावण्यात आल्या.
ओपी परिसरात दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना समोर आली आहे. ही घटना होळीच्या उत्सवादरम्यान घडली. आम्ही दोन्ही समुदायांची ओळख पटवत आहोत. घटनेत सहभागी असलेल्या लोकांचाही शोध घेत आहोत. ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही, असे एसपी डॉ. बिमल यांनी सांगितले आहे.
होळीच्या उत्सवादरम्यान काही समाजकंटकांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असे उपविकास आयुक्त स्मिता कुमारी यांनी सांगितले.