Kolkata Gangrape Case: कोलकाता येथील लॉ कॉलेज परिसरात एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयातील तीन आजी-माजी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. मनोजित मिश्रा, जैब अहमद व प्रमित मुखोपाध्याय उर्फ प्रमित मुखर्जी अशी त्यांची नावे आहेत. पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्यानंतर बुधवारी रात्री आरोपींनी एका खोलीत नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर राजकारणही तापलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
कोलकात्याच्या लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्काराची पुष्टी झाली आहे. कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (सीएनएमसी) येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी आतापर्यंत अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाने यापूर्वी पीडितेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पीडितेने नाकारल्यानंतर आरोपीने त्याच्या मित्रांसह हे कृत्य केले.
पोलिसांच्या तपासादरम्यान, या प्रकरणाबाबत राजकीय वातावरणही तापू लागले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या घटनेबाबत एक विचित्र विधान केले आहे. जर एखादा मित्रच बलात्कार करायला लागला तर काय करायचं असा सवाल बॅनर्जी यांनी केला. "लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेच्या मी बाजूने नाही पण आरोपींना अटक झाली पाहिजे. काही लोक असे गुन्हे करतात पण जर एखाद्या मित्राने त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करु शकतो? शाळांमध्ये पोलीस असतील का? विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थिनीसोबत असे केले. तिचे (पीडित) संरक्षण कोण करेल? हे एक सरकारी कॉलेज आहे. पोलीस नेहमीच तिथे असतील का?" असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.
"महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये पोलिस तैनात करणे शक्य नाही. पुरुष सहकाऱ्यांचे कर्तव्य आहे की ते त्यांच्या महिला सहकाऱ्यांचे रक्षण करतील. जे लोक फिरत आहेत त्यांनी देखील विचार करावा की ते कोणासोबत फिरत आहेत. काही विकृत मानसिकतेचे लोक असे गुन्हे करतात. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांनी अशा लोकांविरुद्ध लढले पाहिजे, जरी ते सरकारी महाविद्यालय असले तरी. महाविद्यालय प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे," असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले.
कल्याण बॅनर्जींचे स्पष्टीकरण
दरम्यान, बलात्कार प्रकरणावर कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. "काही माध्यम संस्थांनी माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढला. मी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे समर्थन करत नाहीत आणि सर्व आरोपींना अटक करण्याच्या बाजूने आहे," असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले.