CM Siddaramaiah on Bengaluru Stampede: तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीलएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे बंगळुरूच्या संघाचा विजयोत्सव बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र काही वेळातच आरसीबीच्या आयपीएल विजयाचा उत्सव एका मोठ्या अपघातात बदलला. आरसीबीच्या संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. परंतु, ही गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर राजकारणही पेटलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेबाबत बोलताना कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे उदाहरण दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे.
बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बंगळुरुचा संघ विशेष विमानाने पोहोचल्यानंतर संघाला मिरवणुकीद्वारे चिन्नास्वामी स्टेडियमकडे घेऊन जाण्याचे नियोजन होते. मात्र याचवेळी चेंगराचेंगरी झाली. ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला. अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने म्हणजे सुमारे दोन ते तीन लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात जमले होते. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत कर्नाटक सरकार देणार आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी भाजपने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. कोणतीही मूलभूत व्यवस्था नव्हती असा आरोप भाजपने केला. दुसरीकडे, कर्नाटक सरकारने जबाबदारी झटकून टाकली आणि क्रिकेट असोसिएशनला दोष दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या प्रश्नांना उत्तर देताना महाकुंभ मेळ्यादरम्यानही चेंगराचेंगरीही झाली होती, असं म्हटलं आहे.
"अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मी त्यांची तुलना करून आणि इकडेही तेच घडले असे म्हणून त्याचे समर्थन करणार नाही. कुंभमेळ्यात ५०-६० लोकांचा मृत्यू झाला होता. मी टीका केली नाही. जर काँग्रेस टीका करत असेल तर ती वेगळी बाब आहे. त्या घटनेवर मी किंवा कर्नाटक सरकारने टीका केली होती का?," असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
"मला या घटनेचा बचाव करायचा नाही. आमचे सरकार या घटनेचे राजकारण करणार नाही. मी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. लोकांनी स्टेडियमचे दरवाजेही तोडले आणि चेंगराचेंगरी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी येण्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. स्टेडियमची क्षमता फक्त ३५,००० लोकांची आहे, पण २-३ लाख लोक आले होते," असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.