एअर इंडियाने AISATS च्या ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. हे अधिकारी अहमदाबाद विमान अपघातानंतर काही दिवसांतच ऑफिसात पार्टी करताना दिसून आले. एअर इंडियाने, हे असंवेदनशील असल्याचे ठरवत, असे वर्तन आपल्या मूल्यांशी सुसंगत नाही. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, एअर इंडियाच्या विमानतळ गेटवे सेवा प्रदात्या AISATS च्या चार वरिष्ठ कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात संबंधित अधिकारी ऑफिसातच पार्टी करताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान क्रॅश झाल्याच्या काही दिवसांनंतरच AISATS च्या गुरुग्राम कार्यालयात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या अपघातात २५९ जणांचा मृत्यू झाला होता.
यासंदर्भात बोलताना एआयएसएटीएसचे प्रवक्ते म्हणाले,कंपनी, विमान क्रमांक एआय 171 च्या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसोबत एकजुटीने उभी आहे. यावेळी त्यांनी संबंधित व्हिडिओसंदर्भात खेदही व्यक्त केला.
प्रवक्त्याने सांगितले की, हे वर्तन आमच्या मूल्यांशी सुसंगत नाही. जबाबदार असलेल्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. सहानुभूती, व्यावसायिकता आणि जबाबदारी प्रति आम्ही वचनबद्ध आहोत. संबंधित चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच अनेकांना इशाराही देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, AISATS, एअर इंडिया लिमिटेड ही टाटा समूहाचा भाग आहे.
अहमदाबादवरून लंडनला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर विमान १२ जून रोजी उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी केवळ एकच भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक वाचला होता.