जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर करून त्यांना चांगलाच धडा शिकवलं. मात्र, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने हे सगळे हल्ले परतवून लावले आहे. भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तिन्ही दलांची मोठी बैठक घेणार आहेत.
पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने हे सगळे प्रयत्न हाणून पाडले आहेत. गुरुवारी रात्री, ८ ते १० वाजताच्या दरम्यान पाकिस्तानने लढाऊ विमाने, ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, कपूरथाला, जालंधर आणि जैसलमेर येथील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
भारताने दिलं चोख उत्तर!भारताने या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून चार पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली, ज्यात दोन अमेरिकेत निर्मित एफ-१६ आणि दोन चीनमध्ये निर्मित जेएफ-१७ लढाऊ विमाने समाविष्ट होती. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या परिस्थितीची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत सीडीएस आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख देखील उपस्थित राहतील.