जयपूर : गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी निर्दोष आहे या गृहितकावर भारतीय कायदा आधारित आहे. त्यामुळे दोषसिद्ध होण्यापूर्वी जामीन मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे विधान माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी १९ व्या जयपूर साहित्य संमेलनात केले. चंद्रचूड यांची 'आयडियाज ऑफ जस्टीस' या सत्रात प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी न्यायवृंद व्यवस्थेत नागरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश करावा, असेही मत मांडले.
उमर खालिदवर काय म्हणाले?
जेएनयूतील माजी विद्यार्थी नेते उमर खालिदच्या जामिनाचा मुद्दा मुलाखतीवेळी उपस्थित झाला. त्यावर चंद्रचूड म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असलेल्या प्रकरणाचा खोलवर तपास करणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. अन्यथा, लोक वर्षानुवर्षे तुरुंगातच राहतात. कनिष्ठ आणि जिल्हा न्यायालयांकडून जामीन न मिळणे हा चिंतेचा विषय आहे.