नवी दिल्ली - सीबीएसईने २०२६ पासून वर्षातून दोनदा १० वीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून CBSE च्या १० वी बोर्डाच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात फ्रेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात या परीक्षा होतील.
पहिल्या टप्प्यात उपस्थित राहणे बंधनकारक
१० वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेला हजर राहणे बंधनकारक आहे तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पर्याय म्हणून आहे. मुलांचे अंतरिम मूल्यांकन केवळ एकदाच केले जाणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या टप्प्यातील परीक्षेत कमी मार्क मिळाले तर त्याला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने १० वीच्या वर्गासाठी वर्षातून दोनदा परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.
का घेतला निर्णय?
CBSE ने हा निर्णय केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीवरून घेतला आहे. त्याचा हेतू मुलांवरील मानसिक दडपण आणि तणाव कमी करणे हा आहे. जेणेकरून मुलांना त्यांच्या चूका सुधारण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्याच्या प्रतिभेचे पूर्ण मूल्यांकन एकाच परीक्षेद्वारे करता येत नाही असं बोर्डाचे मत बनले आहे.