बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत - मेहबूबा मुफ्ती
By Admin | Updated: August 16, 2016 01:10 IST2016-08-16T01:10:15+5:302016-08-16T01:10:15+5:30
बंदुकीने प्रश्न सुटणार नाही, असा संदेश हिंसाचाराच्या मार्गावर निघालेल्या काश्मीरच्या युवकांना व सुरक्षा यंत्रणांना देत काश्मीर व देशापुढील समस्या सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान

बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत - मेहबूबा मुफ्ती
श्रीनगर : बंदुकीने प्रश्न सुटणार नाही, असा संदेश हिंसाचाराच्या मार्गावर निघालेल्या काश्मीरच्या युवकांना व सुरक्षा यंत्रणांना देत काश्मीर व देशापुढील समस्या सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी अवश्य पूर्ण करतील, असा विश्वास जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधला. काहींना काश्मीर सतत पेटता ठेवायचा आहे. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या काश्मीरचे अफगाणिस्तान आणि सिरियात रुपांत होण्यापासून वाचवले पाहिजे, अशी भावूक साद हिंसेत समाविष्ट झालेल्या तरुणांना मेहबूबा यांनी घातली.
हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचा अतिरेकी बुरहान वाणीला मारल्यानंतर राज्यात महिनाभर अशांतता होती. तरीही भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी संवाद सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बंदुकीने कोणत्याही समस्या सुटणार नाहीत. राज्यातील समस्यांचे समाधान करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी अवश्य पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरकडून विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यासाठी वाईटरित्या प्रचार केला जात आहे. मात्र राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक चांगल्या योजना आखल्या आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ द्यावा, अशीही विनंती त्यांनी केली. समस्या आणि तक्रारींवर पर्याय शोधण्यासाठी ‘संवाद’ हा एकमेव पर्याय आहे. जम्मू काश्मीरमधील नागरिक वाईट नाही आणि देशही वाईट नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)