पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सक्षमीकरण महासंमेलनात सहभागी झाले आणि अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. याच दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचं सर्वात मोठं ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचं रक्त सांडलं नाही तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिलं आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी काळ ठरलं आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इतिहासातील दहशतवाद्यांविरुद्धचं सर्वात मोठं आणि सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
"आम्ही घरात घुसून मारू"
"आता आम्ही घरात घुसूनही मारू आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. भारतातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे की, जर तुम्ही गोळी झाडली तर गोळीचं उत्तर गोळीनेच दिलं जाईल.पाकिस्तानी सैन्याने याचा विचारही केला नव्हता, तिथे जाऊन आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. सिंदूर हे आमच्या परंपरेचं प्रतीक आहे, आता ते भारताच्या शौर्याचं प्रतीक आहे"
"'ऑपरेशन सिंदूर हे नारीशक्तीच्या सामर्थ्याचं प्रतीक"
"ऑपरेशन सिंदूर हे आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचं प्रतीक बनलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, या ऑपरेशनमध्ये बीएसएफने खूप मोठी भूमिका बजावली आहे. बीएसएफच्या मुली काश्मीरपासून गुजरातपर्यंत जबाबदारी घेत होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं आहे. बीएसएफच्या शूर कन्यांनी अद्भुत शौर्य दाखवलं आहे. संपूर्ण जग मुलींचे शौर्य पाहत आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.