नवी दिल्ली : कोणताही सामान्य नागरिक कोणाचेही मत ऑनलाइन डिलिट करू शकत नाही. मत डिलिट करण्यापूर्वी, संबंधित व्यक्तीला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. असे असतानाही आळंद मतदारसंघात ६,०१८ मते वगळली गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागराज नावाचा व्यक्ती पहाटे ४ वाजता उठला, ३६ सेकंदांत त्याने दोन फॉर्म भरले आणि नंतर दोन मते डिलिट करून झोपी गेला. यावेळी निवडणूक आयोग झोपला होता का? असा आमचा प्रश्न होता. मात्र तसे नाही. आयोग जागा असून, तो या मतचोरीसाठी मदत करत होता, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
पत्रकारपरिषदेदरम्यान, ६३ वर्षीय गोदाबाईंचा एक व्हिडीओ राहुल गांधींनी दाखविला. त्यात त्या म्हणाल्या की, माझे मत डिलिट करण्यात आले. मला याची काहीच माहिती नाही. गोदाबाईंच्या नावाने बनावट लॉगिन तयार करण्यात आले. १२ मतदारांची नावे डिलिट करण्यात आली. कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने सिस्टिम हॅक करून हा गैरप्रकार केला, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. कर्नाटक सीआयडीच्या १८ पत्रांना आयोगाचा प्रतिसाद नाही, असेही राहुल म्हणाले.
निवडणूक आयोगातूनच आम्हाला हाेतेय मदत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, निवडणुकांत घडविण्यात येत असलेले गैरप्रकार उघड करण्यासाठी निवडणूक आयोगातूनच आम्हाला काही माहिती व मदत मिळत आहे.मतचोरीमागील सत्य देशातील तरुणांना कळल्यानंतर ते आम्हालाच पाठिंबा देतील. निवडणुकांतील गैरप्रकारांमागील मास्टरमाइंड कोण आहे, हेही लवकरच उघड होईल. त्यावेळी मी मागे उल्लेखलेला हायड्रोजन बॉम्ब खऱ्या अर्थाने फुटणार आहे.
घुसखोरांना प्रथम प्राधान्य हा राहुल यांचा खरा अजेंडा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर वारंवार केलेले आरोप हे त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे निदर्शक आहे, असा दावा भाजपने गुरुवारी केला.
घुसखोरांना प्रथम प्राधान्य, हा राहुल गांधी यांचा खरा अजेंडा आहे. ते भारतात नेपाळ व बांगलादेशसारखी अराजकता निर्माण करू पाहात आहेत, असाही आरोप भाजपने केला आहे.
निवडणूक आयोग म्हणतो, हे शक्य नाही
कोणत्याही सामान्य नागरिकाला ऑनलाइन पद्धतीने कोणाचेही नाव वगळता येत नाही, असे सांगून निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केलेले सर्व आरोप खोडून काढले. कोणत्याही व्यक्तीचे नाव मतदारयादीतून वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते, असेही आयोगाने म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार आहेत. २०२३ मध्ये आळंद मतदारसंघात मतदारयादीतून काही जणांचे नाव वगळण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र ते अयशस्वी ठरले. या गैरप्रकाराबद्दल त्याचवेळी आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून एफआयआर दाखल करण्यात आला होता. मतदार नावे हटवण्याच्या प्रकरणाची सर्व माहिती याआधीच पोलिसांना दिली असल्याचे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
आयोग कोणाला वाचवू पाहत आहे? : प्रियांका
आळंद विधानसभा मतदारसंघात गैरप्रकार झाल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले, त्यांच्याच अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला असेल तर मग या प्रकरणाच्या चौकशीत अडथळे का आणले जात आहेत? आयोग कोणाला वाचवू पाहतो आहे आणि कशासाठी?
प्रियांका गांधी, काँग्रेस सरचिटणीस व खासदार
मत चोरीची फॅक्टरी
कुठे काय?
१. ठिकाण : महादेवपुरा
नेमके काय झाले : मतदार वाढविले
किती वाढवले : १,००,२५० मतदार
कसे वाढवले?
१. बनावट मतदार २. अवैध पत्ते ३. चुकीचे फोटो ४. फॉर्म ६ चा गैरवापर ५. एका पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार
२. ठिकाण : आळंद
नेमके काय झाले : ६,०१८ मतदार वगळले गेले
काय पद्धत वापरली?
१. बनावट ऑनलाइन फॉर्म ७ सबमिशन
२. इतर राज्यांतील मोबाइल नंबर वापरले
३. काँग्रेस मतदारांना लक्ष्य करत हटवले.
याचा मास्टरमाइंड कोण? विचारताच, राहुल म्हणाले....
'मत चोरण्याच्या' संशोधन आणि सादरीकरणासाठी आणखी दोन-तीन महिने लागतील.
जेव्हा आमची सादरीकरणं पूर्ण होतील, तेव्हा देशातील निवडणुका कशा चोरील्या गेल्या हे स्पष्ट होईल. सत्य लोकांसमोर मांडणे हे माझे काम आहे.
हे संविधान जनतेचे रक्षण करते आणि मी त्याचे रक्षण करत आहे. रक्षण करणे ही संस्थांची जबाबदारी आहे, पण त्या ती बजावत नाहीत. म्हणून मी उभा आहे.
याचा मास्टरमाईंड कोण आहे, तेव्हा ते की, तेही लवकरच स्पष्ट केलं जाईल आणि त्यांचा “हायड्रोजन बॉम्ब” सगळं काळं-पांढरं करून समोर मांडेल.