रघुनाथ पांडे, नवी दिल्ली -मोबाईलवर बोलणे सुरू असताना मध्येच कॉल ड्रॉप होतो. मग पुन्हा तो लावला जातो.. काही सेकंदानंतर पुन्हा ड्रॉप होतो. मग कॉल पुढच्या व्यक्तीकडून ‘कट’ झाल्याचा सरसकट आरोप करत पुन्हा करून बोलणे सुरू ठेवतो.. साधारणत: मिनिटभरात असे तीन-चारदा घडते. असे घडले की समजावे एक मिनिटाच्या आपल्या मोबाईल बिलात आता चार मिनिटांचे पैसे लागणार आहेत. वरवर पाहता हा कॉल ड्रॉप होण्याचा प्रकार दिसत असला तरी मोबाईल कंपन्याची पैसे उकळण्याची नवी शक्कल असल्याची गंभीर तक्रार महाराष्ट्रातील पाच खासदारांनी केंद्रीय दूरसंचारमंत्र्यांकडे पुराव्यासह केली आहे. मोबाईल कंपन्या ग्राहकांची ग्राहकांची अशी फसवणूक करत आरोप झाल्याने केंद्राने हा मामला गंभीरपणे घेतला असल्याचे खासदारांनी सांगितले. दीड- दोन महिन्यांपासून मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर, औरंगाबादसह देशातील काही शहरात मोबाईलसेवेचे कॉल ड्रॉप होण्याचे त्रांगडे झाले आहे. वारंवार होणारा हा प्रकार ग्राहकाच्या माथी केवळ मनस्तापच देतो. पण असे का होते, याचा शोध खासदारांनी घेतल्याने कोट्यवधी रूपये कमविण्याचा हा धंदा असल्याचे पुढे आले आहे. मोबाईलवर बोलताना सारखे कॉल ड्रॉप होत असल्याने त्रस्त खासदारांनी प्रथम मोबाईल कंपन्यांकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा नेटवर्कच्या समस्येमुळे असे घडत असावे असे सांगण्यात आले.हा नवीन उपदव्याप केंद्राच्या दूरसंचार स्थायी समितीचे सदस्य खा. सुनील गायकवाड, खा. गोपाळ शेट्टी, खा. रामदास तडस, अॅड. चिंतामण वनगा यांनी रविशंकर प्रसाद यांना लेखी तक्रारीतून कळविला.