भारतात कॅथोलिक समाजाच्या सर्वोच्च संस्थेने गुरुवारी धर्मांतरण आणि आदिवासी समाजाशी संबंधित सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानावर प्रश्न उपस्थित केला आहे. भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. ‘कॅथोलिक बिशप्स कॉन्फ्रेंस ऑफ इंडिया’ने (सीबीसीआय) गुरुवारी त्यांच्या या विधानावर टीका केली.
काय म्हणाले होते भागवत? -टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, भागवत सोमवारी इंदूरमध्ये एका भाषणात म्हणाले, "जेव्हा संसदेत 'घर वापसी' मुद्द्यावरून गदारोळ सुरू होता, तेव्हा आपण देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली होती. तेव्हा इतर धर्मातून हिंदू धर्मात परतणाऱ्या लोकांसंदर्भात देशभरात जबरदस्त चर्चा सुरू होती. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, "आपण हे काय करत आहात? यामुळे वाद निर्माण होतो. कारण हे राजकारण आहे. जर मी राष्ट्रपती नसतो आणि काँग्रेस पक्षात असतो, तर मीही संसदेत विरोध करताना दिसलो असतो.
पुढे बोलताना भागवत म्हणाले, "यानंतर प्रणब मुखर्जी बोलले की, 'पण आपण जे काम केले आहे, त्यामुळे 30 टक्के आदिवासी...' त्यांना काय बोलायचे होते ते मला समजले आणि मी खूश झालो. यावर मी म्हणालो, '...(अन्यथा) मी ख्रिश्चन झालो असतो?' यावर ते म्हणाले, 'ख्रिश्चन नव्हे, राष्ट्र-विरोधी'".
या संदर्भात, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या नावाने बनावट वैयक्तिक संभाषण आणि संशयासंपद विश्वसनीयता असलेल्या संघटनेच्य निहित स्वार्थाने मरणोत्तर बोलणे, छापणे एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे.
डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना का बोलले नाही?"डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना मोहन भागवत का बोलले नाही? त्यांचा हेतू वाईट, भयावह आणि अवास्तविक असल्याचे दिसते. हे वक्तव्य खरे असेल आणि माजी राष्ट्रपतींनी असे काही म्हटले असेल, असे आम्हाल वाटत नाही. आम्ही राष्ट्राप्रति असलेले त्यांचे योगदान आणि मातृभूमीच्या बहुलवादी धर्मनिरपेक्षतेच्या त्यांच्या आदरयुक्त विचारांचा आदर करतो. 'गेल्या अनेक दशकांपासूनच्या हिंसक भारतीय इतिहासाशी संबंधित असलेल्या तीन वेळा बंदी घातलेल्या संघटनेला, अहिंसक, शांतिप्रिय आणि सेवाभावी ख्रिश्च समाजाला राष्ट्र-विरोधी म्हणण्याची सूट आहे,' हे दुर्देवी आहे," असेही कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.