Ahmedabad Plane Crash: गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या २७० जणांच्या मृत्यूनंतर देशभरातली पीडित कुटुंबे भीषण अपघातातून सावरण्यासाठी संघर्ष करत आहेत. दुसरीकडे मात्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरमुळे पीडित कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही इन्फ्लुएन्सरने हे या अपघातात जीव गमावलेल्या लोकांविषयी खोटी माहिती परसवण्याचे काम करत आहेत. या अपघातात पती प्रतीक जोशी आणि तीन मुलांसह मृत्युमुखी पडलेल्या कोमी व्यास यांचाभाऊ कुलदीप भट्ट यांनी सोशल मीडियावर या दुर्घटनेचा गैरवापर करण्याविरुद्ध तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत असे न करण्याची विनंती केली आहे.
अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या फ्लाईट AI171 च्या दुर्दैवी अपघातात विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला होता. लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही वेळातच मेघानीनगर परिसरातील एका मेडिकल हॉस्टेल आणि कॅन्टीन कॉम्प्लेक्सवर कोसळले. यामध्ये कोमी व्यास, तिचे पती प्रतीक जोशी आणि त्यांची मुले प्रद्युत, नकुल आणि मिराया होते. कुलदीप भट्ट यांनी अपघातानंतर आमचे संपूर्ण कुटुंब धक्क्यातून आणि मानसिक तणावातून जात असल्याचे सांगितले. काही लोक आमच्या कुटुंबाचे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यामुळे आम्हाला समजून घ्या आणि अफवा पसरवू नका, अशी विनंती कुलदीप भट्ट यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना केली आहे.
"सर्वात मोठी समस्या अशी आहे की आमचे कुटुंब आणि इतर २७० जणांचे कुटुंब मानसिक आघातातून जात आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्यांचे व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात, क्रॅश व्हिडिओंचा गैरवापर करत आहेत, बनावट दृश्ये पोस्ट करत आहेत. जेव्हा कोमी आणि इतर लोक फ्लाइटमधून जात होते, तेव्हा त्यांनी एक सेल्फी काढला आणि आमच्या कुटुंबाच्या ग्रुपमध्ये पोस्ट केला. आता तो फोटो व्हायरल झाला आहे. लोक त्या फोटोवरून व्हिडिओ तयार करत आहेत. असाच एक व्हिडिओ संपूर्ण भारतात व्हायरल झाला आहे. तो एआय-जनरेटेड आहे. त्या फोटोवरु बनावट व्हिडिओ बनवण्यात आला आहे," असं कुलदीप भट म्हणाले.
प्रदीप यांच्या मुलीचा फोटोही सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे. त्यावरूनही भट्ट यांनी नाराजी व्यक्त केली. "कालपासून सोशल मीडियावर एक फोटो फिरत आहे ज्याचा आम्हाला खूप त्रास होतोय. ती मुलगी मिराया आहे, खूप सुंदर मुलगी होती. आता आम्हाला डीएनए नमुन्याबद्दल काहीच माहिती नाही. ते जुळत नाहीयेत. पण सोशल मीडियावर लोक तिचा मृतदेह जळाल्याचा दावा करत आहेत. तिच्या अंत्यसंस्काराचे व्हिडिओही फिरत आहेत," असं कुलदीप भट यांनी सांगितले.
"कोमीच्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे. तिच्या नावाने फेक अकाउंट बनवले गेले आहेत. मी सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना विनंती करतो की कृपया ते थांबवा. तुमचे लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही आम्हाला इतका मानसिक त्रास का देत आहात?" असाही सवाल भट्ट यांनी केला.