बेंगळुरू : भारताने सोडलेले मंगळ यान आजपासून ठीक १०० दिवसानंतर लाल ग्रहावर पोहोचणार आहे. या मंगळ यानाने आपला ७० टक्के प्रवास पूर्ण केलेला आहे आणि ते आपल्या पूर्ण वेगाने लक्ष्याकडे जात आहे.आपला ३०० दिवसांचा प्रवास पूर्ण करून हे मंगळ यान २४ सप्टेंबरला मंगळावर पोहोचणार आहे.मार्स आॅबिरटर मिशन (एमओएम) साठी २४ सप्टेंबर हा दिवस भारतासाठी खरोखरच मैलाचा दगड ठरणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार या दिवशी हे यान मंगळाचा स्पर्श करेल, असे बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या मुख्यालयाने सांगितले.आपल्या ३०० दिवसांच्या मंगळ प्रवासावर निघालेले एमओएम दूर अंतराळात वेगाने आपल्या लक्ष्याकडे जात आहे. सध्या या यानाचे पृथ्वीपासूनचे रेडियो अंतर १०८ दशलक्ष कि. मी. आहे. या मंगळ यानाने पाठविलेले सिग्नल पृथ्वीवर पोहोचण्यास सहा मिनिटे लागतात.मंगळ यान आणि त्याचे सर्व पाचही पेलोड्स सुस्थितीत आहेत, असे इस्त्रोने आपल्या मार्स मिशन फेसबुक पेजवर म्हटले आहे. इस्रोने ११ जून रोजी मंगळ यानाचे २२ न्युट्रॉन ट्रस्टर्स १६ सेकंदपर्यंत डागून टीसीएम-२ हा दुसरा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. यानाला योग्य दिशेत ठेवण्यासाठी हा टप्पा पूर्ण करण्याची गरज असते. (वृत्तसंस्था)
मंगळयान १०० दिवसांत लाल ग्रहावर पोहोचणार
By admin | Updated: June 17, 2014 00:26 IST