चेन्नई: पती आणि सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे मानहानी आहेच, शिवाय ते मानसिक क्रौर्यही आहे, पतीच्या बाजूने घटस्फोटाचा निर्णय देताना, मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच हे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती जे. निशा बानू आणि न्यायमूर्ती आर. शक्तीवेल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. घटस्फोटाची याचिका फेटाळावी आणि वैवाहिक हक्क परत मिळावे याबद्दल पत्नीने याचिका केली होती. त्याला कौटुंबिक न्यायालयाने मान्यता दिली होती. त्या आदेशाविरुद्ध पतीने दाखल केलेल्या अपिलावर खंडपीठ सुनावणी करत होते. या जोडप्याने २०१५ मध्ये लग्न केले आणि २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. पत्नीने पतीच्या व त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्याचा खटला दाखल केला होता.
पतीचे आरोप काय? पतीचा घटस्फोटाचा खटला दाखल करताना आरोप केले होते की, त्याची पत्नी खूप भांडखोर होती. तिला पालकांबरोबर राहायचे नसल्याने त्यांचा सतत अपमान करायची.त्याला आणि त्याच्या पालकांना शिवीगाळ करत होती. पत्नीच्या संशयी स्वभावामुळे आणि सततच आत्महत्या करण्याच्या धमक्यांमुळे पतीला अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरी सोडावी लागली, असेही पतीने म्हटले आहे.
पत्नीचे आरोप काय? घटस्फोटाचा खटला प्रलंबित असताना, पत्नीने पतीच्या आणि त्याच्या वडिलांविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीकारक टिप्पण्यांसह खोटी तक्रार दाखल केली.सासरे आपला लैंगिक छळ करत होते. तसेच पती इतर मुलींशी छेडछाड करत होता. तसेच तो अनेक मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता, असा पत्नीचा आरोप होता. तसेच आपला हुंड्यासाठीही छळ करण्यात आला असा आरोप पत्नीने तिच्या तक्रारीत केला आहे.