जबलपूर :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोमवारी जबलपूर येथील सेठ गोविंददास शासकीय जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी डॉ. यादव म्हणाले की, दर्डा यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे जबलपूरशी अतिशय जवळचे नाते होते. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात या शहरात एक वर्ष नऊ महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या शहरामध्ये आरोग्यसेवा विस्तारासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
डॉ. यादव म्हणाले की, जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मध्य प्रदेशलाही त्यांचासारखा उद्योगमंत्री लाभला असता तर आमच्या राज्यातही चांगली औद्योगिक प्रगती झाली असती. ते पुढे म्हणाले की, काळ बदलला आहे. मध्य प्रदेशात अनेक विकासकामे होत आहेत. जबलपूरसह संपूर्ण महाकौशल वेगाने प्रगती करत आहे. विकासाबाबत सरकार कोणतीही कसूर ठेवणार नाही. मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाममंत्री राकेश सिंह, जबलपूरचे खासदार आशिष दुबे, आमदार अशोक रोहाणी, सुशील तिवारी इंदू, संतोष बरकडे, भाजपचे नगराध्यक्ष रत्नेश सोनकर, ग्रामीण अध्यक्ष राजकुमार पटेल आणि जबलपूर महापालिकेचे अध्यक्ष रिकुंज विज उपस्थित होते. लोकमत मीडिया समूहाचे संचालक अशोक जैन, वरिष्ठ संपादक विकास मिश्रा, लोकमत समाचार नागपूरचे संपादक रवींद्र भजनी व सेठ गोविंददास रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. नवीन कोठारी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जबलपूर तीर्थक्षेत्रासारखेच : देवेंद्र दर्डा
लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा म्हणाले की, संस्कारशील जबलपूरशी आमचे अतूट नाते आहे. आमच्यासाठी हे शहर तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. याच कारणामुळे लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान येथे एक वर्ष नऊ महिने कठोर कारावास भोगला होता. २००४ मध्ये जेव्हा जबलपूरवर आपत्ती आली होती, तेव्हा येथे आयसीयूची उभारणी करण्यात आली. बाबूजी ज्या तुरुंगात होते, तिथे दरवर्षी वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले जाते. देवेंद्र दर्डा म्हणाले की, स्वातंत्र्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाबूजींनी दोन मार्ग निवडले – एक म्हणजे वृत्तपत्र आणि दुसरा म्हणजे राजकारण. वृत्तपत्रासाठी त्यांचा ‘वाचक’ हा मूलमंत्र होता. याच सूत्राला अनुसरून तो वारसा डॉक्टर विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा पुढे चालवत आहेत.
जवाहरलाल दर्डा यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्रातील विविध खात्यांमध्ये २३ वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी सामाजिक भान राखत लोकहिताची अनेक उल्लेखनीय कामे केली - डॉ. मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश