Jammu Kashmir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझ जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर, कटरा येथे काश्मीरच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदीं तोंडभरुन कौतुक केले.
'ब्रिटिशांनाही जे काम जमले नाही...'ओमर अब्दुल्ला म्हणाले, चिनाब पूल प्रकल्प पूर्ण होताना पाहणे हे प्रत्येकाचे स्वप्न होते, ते पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. जे काम ब्रिटिशांनाही जमले नाही, ते काम आपल्या पंतप्रधानांनी करुन दाखवले आहे. जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा मी आठवीच्या वर्गात होतो. आता मी ५५ वर्षांचा आहे, इतक्या वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
अटलबिजारी वाजपेयींचाही उल्लेख
यावेळी अब्दुल्लांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेटी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, आज मी माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे नाव घेतले नाही, तर योग्य ठरणार नाही. त्यांनी या प्रकल्पाला त्याकाळी राष्ट्रीय महत्व मिळवून दिले आणि यासाठी भरगोस निधी दिला. राज्यातील जनतेने अनेक दशकांपूर्वी हे स्वप्न पाहिले होते. या प्रकल्पाचा जम्मू-काश्मीरला खूप फायदा होईल. चिनाब पूल राज्याच्या विकासाला गती देईल. यामुळे राज्याची प्रगती होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, या प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना, विशेषतः सफरचंदांचा व्यापार करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आता काश्मीरमध्ये पिकणारे सफरचंद देशाच्या विविध भागात सहज पोहोचू शकतील, ज्यामुळे राज्याची आर्थिक स्थितीही सुधारेल. यामुळे केवळ उत्पन्न वाढणार नाही तर तरुणांना रोजगारही मिळेल.
पूर्ण राज्याची मागणी... मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, २०१४ मध्ये कटरा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाला या मंचावर चार लोक उपस्थित होते. त्यावेळी तुम्ही पहिल्यांदाच पंतप्रधान झालात. मनोज सिन्हा रेल्वे राज्यमंत्री होते आणि मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. आज मनोज सिन्हा उपराज्यपाल आहेत, म्हणजेच त्यांना पदोन्नती मिळाली आहे. पण मी आता राज्याचा नाही, तर एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री झालो आहे, म्हणजेच मला पदावनती मिळाली आहे. मला विश्वास आहे की ही परिस्थिती लवकरच बदलेल आणि तुमच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल.
लाखो लोकांचे स्वप्न पूर्णयावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला चिनाब पूल आणि अंजी पूल उद्घाटन करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. जम्मू-काश्मीरला दोन नवीन गाड्यादेखील मिळत आहेत. या विकासासाठी मी राज्यातील नागरिकांचे अभिनंदन करतो. रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न पाहत अनेक पिढ्या येथे गेल्या. आज लाखो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.