राहुल गांधींना दोष देणे अयोग्य
By admin | Published: May 14, 2014 03:57 AM2014-05-14T03:57:30+5:302014-05-14T03:57:30+5:30
जर पक्षाला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या तरी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अद्याप २ दिवसांचा अवधी असला तरी ‘एक्झिट पोल’च्या अंदाजांमुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी डॉ.मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला निरनिराळ्या योजना व चांगले काम जनतेपर्यंत पोहोचवता आले नाही असे मत व्यक्त केले आहे. जर पक्षाला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या तरी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. ‘एक्झिट पोल’नुसार खरोखरच कॉंग्रेसची कामगिरी खालावली तरी त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्याचे काहीच कारण नाही. निवडणूकांचे निकाल हे जनतेच्या मनात सरकाच्या कार्यप्रणालीविषयीच्या भावनेचे प्रतिबिंब असते. चांगल्या कामाला जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक होते. राहुल गांधी हे कधीही सरकारचा भाग नव्हते असे कमलनाथ म्हणाले. निकालांच्या बाबतीत कॉंग्रेस फार आशावादी देखील नाही व निराशावादीदेखील नाही. आमचा वास्तविकतेवर जास्त भर आहे. ‘एक्झिट पोल’वर विश्वास ठेवण्यापेक्षा १६ मे रोजी काय होते याकडे आमचे लक्ष आहे असे त्यांनी सांगितले. ‘संजद’ने फेटाळले आकडे बहुतांश ‘एक्झिट पोल’नुसार बिहारमध्ये ‘संजद’ला (संयुक्त जनता दल) चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत. ‘संजद’तर्फे मात्र हे आकडे फेटाळण्यात आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निकालाचीच प्रतिक्षा करण्याची भुमिका घेतली असून ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. यासंदर्भात नितीश कुमार यांना प्रश्न विचारले असता ‘हे तुम्हीच लोक बोलत आहात’ असे उत्तर त्यांनी दिले. सोबतच निकालाची प्रतिक्षा करा असे म्हणत त्यांनी ‘संजद’ला चांगल्या जागा मिळण्याचे संकेत दिले.