आयओटीएल कंपनीचा नाफ्ता चोरणार्या टोळीला अटक पाइपला छिद्र : राजकीय पदाधिकारी मुख्य सूत्रधार
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
नवी मुंबई : उरणमधील आयओटीएल कंपनीच्या भूमिगत पाइपमधून नाफ्ता चोरणार्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लिटर नाफ्त्यासह ३६ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. कंपनीपासून ५०० मीटरवरच अनेक वर्षांपासून नाफ्ता चोरीचा हा प्रकार सुरू होता.
आयओटीएल कंपनीचा नाफ्ता चोरणार्या टोळीला अटक पाइपला छिद्र : राजकीय पदाधिकारी मुख्य सूत्रधार
नवी मुंबई : उरणमधील आयओटीएल कंपनीच्या भूमिगत पाइपमधून नाफ्ता चोरणार्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लिटर नाफ्त्यासह ३६ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. कंपनीपासून ५०० मीटरवरच अनेक वर्षांपासून नाफ्ता चोरीचा हा प्रकार सुरू होता.चोरीचा नाफ्ता विकण्यासाठी महापे येथे एक टँकर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेली. त्यानुसार सापळा रचून विनयकुमार शर्मा (३६) याला ट्रेलरसह (एमएच- ०४, जीएफ-७०८९) अटक करण्यात आलेली. चौकशीत त्याच्याकडील ट्रेलरमध्ये २० हजार लिटर नाफ्ता आढळून आला. त्याने उरण येथून हा नाफ्ता आणल्याची कबुली पोलिसांना दिलेली. त्यानुसार उरण येथील घटनास्थळाच्या पाहणीत आयओटीएल (इंडियन ऑइल टँकिंग) कंपनीच्या भूमिगत पाइपला छिद्र पाडलेले होते, असे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. कंपनीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर झाडीमध्ये जमिनीत दोन मीटर खोल खड्डा खोदून पाइपला छिद्र पाडून वॉल बसवण्यात आलेला. तर कोणाला संशय येऊ नये याकरिता कंटेनरमध्ये टँकर ठेवून त्यामध्ये नाफ्ता भरला जायचा. अनेक वर्षांपासून चाललेल्या या नाफ्ताचोरीच्या प्रकरणाची माहिती आयओटीएल कंपनीला देखील नव्हती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उरणचा एक राजकीय पदाधिकारी असून कारवाईच्या भीतीने कुटुंबासह फरार झालेला आहे. पेट्रोल- डिझेलमध्ये भेसळीसाठी मोठ्या प्रमाणात नाफ्त्याचा वापर होत असतो. त्याकरिता ठिकठिकाणी या नाफ्त्याची विक्री केली जायची. उरण परिसरात यापूर्वीही नाफ्ताचोरीचे प्रकार उघड झालेले आहेत. अत्यंत ज्वालाग्राही असल्याने नाफ्त्याची उघड वाहतूक केली जात नाही. असे असतानाही ही टोळी नाफ्ता चोरी करून टँकरमधून संबंधितांना पुरवायची. मात्र नाफ्त्याच्या ठिकाणी अनपेक्षितपणे ठिणगी पडली असती तर स्फोटाने दीड किलोमीटरचा परिसर भस्मसात झाला असता, असे कंपनीने स्पष्ट केले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले.या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हे उपआयुक्त मेंगडे, सहाय्यक आयुक्त रणजित धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारे यांनी सहाय्यक निरीक्षक सुभाष शिंदे, अजित शिंदे व हवालदार संजय कदम, नामदार किरण राऊत, अनिल यादव यांचे पथक तयार केलेले. या पथकाने शीघ्रगतीने तपास करून २० हजार लिटर नाफ्त्यासह टँकर, पाइप असा ३६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांना अटक केली. विनयकुमार शर्मा (३६), सुरज पांडे (३५), इम्तियाज अली चौधरी (५५), अन्वर खां, (५४), राजदेवजित सरोज (६२) आणि रामसमुज यादव (५२) अशी त्यांची नावे आहेत. तर मुख्य सूत्रधारासह इतर पाच जणांचा शोध सुरू असल्याचे उपआयुक्त मेंगडे यांनी सांगितले. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)