नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या आक्रमक मूलतत्त्ववादी संघटनेने इराकमध्ये सुरू केलेल्या यादवीतून भारतीय उपखंडातील घुसखोरीचा वाढलेला धोका आणि तेथे अडकलेल्या भारतीयांची सुरक्षितता या पाश्र्वभूमीवर भारताने पर्शियन आखातात आपल्या दोन युद्धनौका तैनात केल्या आहेत.
आयएनएस म्हैसूर पर्शियन आखातात दाखल झाल्याची माहिती नौदलाच्या सूत्रंनी दिली आहे. सरकारने शुक्रवारी आयोजित केलेल्या संकटकालीन प्रबंधन समितीच्या बैठकीनंतर ही पावले उचलली आहेत. या युद्धनौकेला सज्ज राहण्याचे व पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आयएनएस तर्कश या युद्धनौकेलाही अदनच्या खाडीत तैनात करण्यात आले असून, गरज पडल्यास दोन्ही युद्धनौका भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतील, असे सूत्रंनी स्पष्ट केले.
याव्यतिरिक्त भारतीय हवाई दलालाही पूर्ण सज्जतेचा आदेश देण्यात आला आहे. नागरिकांच्या सुटकेच्या मोहिमेत गरज भासल्यास तत्काळ सी 17 व सी 13क् जे ही सुपर हक्यरुलस विमाने तैनात केली जाणार आहेत. भारताने आतार्पयत 36 नागरिकांची सुटका केली असून, या नागरिकांनी भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)