नवी दिल्ली : सन २००४ मध्ये पंतप्रधानपदी प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची वर्णी लागली त्याक्षणी केवळ काँग्रेसच्याच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते. प्रणव मुखर्जी पंतप्रधान असते तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे राहिले असते,असे आजही अनेकांचे मत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘दी अदर साइड आॅफ दी माऊंटेन’ या आपल्या नव्या पुस्तकात हे विचार मांडले आहेत.जून १९९१ ते १९९६ या काळात नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना मनमोहनसिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलली होती. संपूर्ण राष्ट्राने यासाठी त्यांची प्रशंसा केली होती. मात्र १९९९ मध्ये मनमोहनसिंग देशातील काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानल्या गेलेल्या दक्षिण दिल्लीतून निवडणुकीच्या आखड्यात उतरले आणि अनेकांना कदाचित स्मरणातही नसेल अशा एका उमेदवाराने त्यांचा पराभव केला. मनमोहनसिंग यांचा पराभव करणारे हे उमेदवार होते भाजपाचे विजय कुमार मल्होत्रा. सुरुवातीचा सौम्य विरोध सोडला तर संपुआ-१ चे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांची निवड केली तेव्हा या निर्णयाचे मोठे स्वागत झाले. केवळ स्वागतच नाही तर पाच वर्षांनंतर जनतेने पुन्हा एकदा संपुआला कौल देऊन हा निर्णय योग्य ठरवला, असे खुर्शीद यांनी लिहिले आहे. माझे पुस्तक कुण्या एका व्यक्तीचे नाही तर संपुआचा भाग असलेल्या अनेकांचे संक्षिप्त चरित्र आहे,असेही खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात आवर्जून नमुद केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘पक्षात नैराश्य पसरले होते’२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतरच्या घडामोडींचा उल्लेखही त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. १६ मे रोजी लोकसभेचा निकाल आला. आम्ही (संपुआचे मंत्री) विविध मतदारसंघातून नवी दिल्लीला परतलो. पराभव झाला होता पण पराभव मान्य न करणाऱ्या योद्ध्यांसारखी आमची स्थिती होती. आता आम्ही भूतकाळ होतो. काँग्रेसमध्ये नैराश्य पसरले होते, असे त्यांनी लिहिले आहे. हाच धागा पकडून काँग्रेसचे अस्तित्व संकटात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही लोकप्रिय नेते आहेत आणि लोकांमधून निवडून आलेले नेते आहे. मात्र पर्यायी नेतृत्वाचा विचार केल्यास दूरदूरपर्यंत काँग्रेसमध्ये कुणीच दिसत नाही, असेही त्यांनी लिहिले आहे.
मुखर्जी पंतप्रधान असते तर सत्ता गेलीच नसती
By admin | Updated: December 16, 2015 03:58 IST