नवी दिल्ली- भारत लवकरच वातानुकूलन उपकरणांसाठी (एअर कंडिशन - एसी) एक नवीन राष्ट्रीय मानक लागू करणार आहे. प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवता येणार नाही - मग ते घरगुती एसी असो, ऑफिस सिस्टम असो किंवा मॉल-हॉटेलचे सेंट्रल चिलर असो... केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिल्लीत याबाबत मंगळवारी घोषणा केली. हा एक ‘आगळावेगळा प्रयोग’ आहे, असे वर्णन खट्टर यांनी केले आहे.
नवीन नियमांमागचे कारण काय?सरकारच्या या नियमामुळे विजेची प्रचंड मागणी, वाढते वीज बिल आणि कार्बन उत्सर्जन एकाचवेळी कमी होईल. ऊर्जा तज्ञांच्या मते, एसी तापमानात प्रत्येक १ अंश वाढ केल्याने सुमारे ६ टक्के वीज वाचते. यापूर्वी इटलीने आधीच त्यांच्या सर्व सार्वजनिक इमारतींमध्ये २३ अंश सेल्सिअसची किमान मर्यादा लागू केली आहे, तर जपानमध्ये २७ अंश सेल्सिअस तापमानाचे धोरण आहे. २०२५-२६च्या उन्हाळ्यापूर्वी सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि मोठे शॉपिंग मॉल या मर्यादेचे पालन करतील, असे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.