हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशाचा वित्तीय गुप्तचर विभाग अनेक निर्यातदार कंपन्यांची व्यापार-आधारित मनी लाँड्रिंगच्या संशयावरून चौकशी करत आहे. या माध्यमातून कथितरीत्या संयुक्त अरब अमिरातच्या माध्यमातून पाकिस्तानसाठी आणि पाकिस्तानातून निधी हस्तांतरण होत असल्याचे समोर आले आहे.
अधिकृत बंदी असूनही अनौपचारिक व्यापार मार्ग कसे भरभराटीला येत आहेत, हे यावरून स्पष्ट होते. व्यापारात स्वस्त दागिने, मौल्यवान स्टोन, सुकामेवा, सौंदर्य उत्पादने आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश आहे. तपासात याबाबतच्या पावत्या आढळून आल्या आहेत. अगदी १०० रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू ८००० ते १९००० रुपयांना विक्री करण्यात आल्या, तर १५० रुपये किमतीचे दागिने ३० हजार रुपयांना विक्री केलेत. काही प्रकरणांमध्ये यूएईतील मध्यस्थांना दिले जाणारे कमिशन वस्तूंच्या किमतीपेक्षा अधिक होते.
२०१९ मध्येही भारत आणि पाकमधील व्यापार थांबला असला, तरी तिसऱ्या देशांमधून यूएईमधून होणारा अप्रत्यक्ष व्यापार तेव्हाही अप्रत्यक्षपणे सुरू होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बंदी अनेकदा औपचारिक मार्गांमध्ये अडथळा आणते; परंतु भूमिगत नेटवर्क थांबवण्यासाठी फारसे काही करत नाही.
गेल्या १४ महिन्यांतील व्यवहारांची तपासणी
एका अधिकाऱ्याने सांगितले, एफआययू गेल्या १४ महिन्यांतील व्यवहारांची तपासणी करत आहे. दहशतवादाशी काही संबंध आहे काय याचा तपास करण्यासाठी अन्य तपास एजन्सींना ही माहिती दिली जात आहे. अशी उदाहरणे सीमापार आर्थिक गुन्ह्यांमध्ये व्यापार-आधारित मनी लाँड्रिंगची वाढती भूमिका अधोरेखित करतात.
उत्तर वझिरिस्तानात १४ दहशतवाद्यांचा खात्मा
अफगाणिस्तानला लागून असलेल्या उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यातील दाताखेल परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत १४ दहशतवादी ठार झाले अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या प्रसारमाध्यम विभागाने बुधवारी दिली. २ व ३ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.
बिलावल भुत्तोचा तोरा उतरला, म्हणे, एकत्रित दहशतवादाविरुद्ध लढू
भारत व पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांमध्ये माहितीची देवाणघेवाण झाल्यास, सहकार्य वाढल्यास दक्षिण आशियातील दहशतवादात लक्षणीय घट होऊ शकते असे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो-झरदारी यांनी म्हटले आहे. पूर्वी भारताविराेधात बाेलणाऱ्या भुत्तोनी आता नरमाईचा सूर लावल्याचे दिसते.
भारताबरोबर नुकत्याच झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानने आपल्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने बिलावल यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भुत्तो यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाली. हे केवळ पहिले पाऊल असून आणखी अनेक गोष्टी दोन्ही देशांना साध्य करायच्या आहेत.